नाशिक : चांदवड तालुक्यातील नारायणगाव येथील संजय रेवजी मांदळे (३६) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून बुधवारी (दि. ४) दुपारी खडकओझर येथील केद्राई धरणात उडी घेऊन आत्महत्त्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. संजय मांदळे यांच्यावर पतसंस्था व सोसायटीचे कर्ज तर नातेवाइकांचे उसनवार व शेती गहाण ठेवून घेतलेले सुमारे सात लाख रुपयांचे कर्ज होते. संजयने मंगळवारीच त्याच्या काकांना आपण कर्जाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे फोनद्वारे सांगितले होते. मांदळे यांचे काका बाळू जाधव (रा. जोपूळ) हे इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी बंधाऱ्यावर आले असता, त्यांना बंधाऱ्याच्या भरावावर संजयची मोटारसायकल दिसली. जाधव यांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. ग्रामस्थांच्या मदतीने केद्राई धरणात शोध घेतला असता संजयचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.वडाळीभोई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
चांदवड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Updated: January 7, 2017 01:38 IST