येवला : बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे आता बँक ग्राहकांना ७ आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पर्यायाने एटीएमवर गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १ आॅक्टोबरला बँका अर्धवार्षिक कामांमुळे सुरू राहणार असल्या तरी ग्राहकांसाठी त्या बंद असतील. त्यानंतर २ आॅक्टोबरला गांधी जयंती, ३ आॅक्टोबरला दसरा असल्याने बँकांना सुट्टी आहे.४ आॅक्टोबरला शनिवार असल्यानं सर्व बँका अर्धा दिवस खुल्या असतील. ५ आॅक्टोबरला रविवारी आठवड्याची सुट्टी आहे. यंदा ५ आॅक्टोबरला बकरी ईद आहे. मात्र सरकारी अधिसूचनेनुसार बकरी ईदची सुट्टी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ आॅक्टोबरला देण्यात आली आहे. त्यामुळं सोमवारी बकरी ईदमुळे बँका बंद राहतील. त्यानंतर ७ आॅक्टोबरला बँका नियमित सुरू होतील. मात्र आठवडाभराची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. चेक क्लिअरिंगसाठी सध्या किमान ४८ तासांचा अवधी लागतो. ही प्रक्रि या संगणकीय असली तरी बँकांचे कामकाजच थंडावणार असल्यानं चेक क्लिअरिंगसाठी किमान सहा दिवस लागतील. तसंच २ आॅक्टोबर आणि ३ आॅक्टोबर या दोन्ही दिवशी सुट्या असल्यानं एटीएममध्ये पैशांचा भरणा होणार नाही. त्यामुळे सर्व एटीएम मशीनवर ताण पडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
बँक ग्राहकांना करावी लागणार प्रतीक्षा
By admin | Updated: September 30, 2014 22:31 IST