गुरुवारी सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
तत्कालीन सभापती अमितसिंह तेहरा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही निवडणूक होत आहे. २१ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवर आठ सदस्य निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्यासह किशोर स्वामी, ज्योती कदम, बालाजी जाधव, खान अब्दुल अलीम खान, ईश्वरलाल यादव, कुरेशी रेहाना, बेगम चाँदपाशा आणि कविता मुळे यांचा समावेश आहे.
कोरोना संकटात जवळपास वर्षभर महापालिकेला कोणतीही विकासकामे करता आली नाही. आर्थिक तरतुदीअभावी ही कामे होऊ शकली नाहीत. आता अनलॉक प्रक्रियेनंतर शहरातील विविध विकासकामांच्या प्रस्तावाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे. चव्हाण यांनी राज्य शासनाकडून विशेष निधीही आणला आहे. राज्य शासनाकडे आणखी काही प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात विकासकामांना वेग येणार आहे.