स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने बी. ए., बी.एस्सी. व बी. कॉम. अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षेत थिअरी पॅटर्न लागू केल्यानंतर एकाच दिवशी ऐच्छिक विषयाचे दोन पेपर घेतले. या बदलाचा विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसला. त्यावेळी पदवी शाखेत प्रथम वर्षात १५ हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ साडेसहाशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. हा निकाल फेब्रुवारी महिन्यात लागल्यानंतर सत्र परीक्षा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. परीक्षा पद्धतीत अनेक वेळा बदल केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यानंतर कोरोना महामारीमुळे उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या की ऑनलाइन, यात मोठा वेळ गेला.
दरम्यान, स्वारातीम विद्यापीठाच्या सीएचबी प्राध्यापकांसाठी हे वर्ष कसोटीचे ठरले. लॉकडाऊनमुळे सीएचबी प्राध्यापकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले. अनुदानित संलग्नित १२५ महाविद्यालयांत जवळपास अडीच ते तीन हजार सीएचबी प्राध्यापक कार्यरत होते.
यंदा पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची प्रथमच कोर्सवर्कची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घ्यावी लागली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागात पदवीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. जवळपास ३० हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
उन्हाळी सत्र परीक्षेच्या कालावधीत ऑक्टोबर महिन्यात स्वारातीम विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत अडथळे निर्माण झाले.
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात, असा निर्णय दिल्याने स्वारातीम विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाइन व ४० टक्के ऑफलाइन घेण्याची घोषणा नांदेड येथे येऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.