नांदेड : जिल्ह्यात जवळपास दीड लाख एकर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले असून पाण्याअभावी पिकांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे़ त्यामुळे खरीपातील पिकांची अवस्था 'कोमात' गेल्यासारखी झाली आहे़ त्याचा फटका आता उत्पादनावर होणार आहे़ पावसाने दडी मारल्याने सर्वाधिक फटका कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाची अवकृपा होत असून यावर्षी त्यात मोठी भर पडली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस लांबला त्यामुळे त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. शेतकऱ्यांचे हातचे सोयाबीन, मूग, उडिद पीकही गेले़ कोरडवाहू शेतकरी चिंतेत- जिल्ह्यात पावसाअभावी जून-जुलै, आॅगस्ट महिनाही कोरडा जात असल्याने आजपर्यंत पडलेल्या तुरळक सरी वगळता वरुणराजाने हजेरी न लावल्याने कोरडवाहू शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र मोठे असल्यामुळे सिंचनाच्या सोईसुविधाही अल्प प्रमाणात आहेत. अशात बागायत शेतीलाही पाणी देण्यासाठी भारनियमनाचा फटका बसत आहे. पावसाची दडी व पेरण्यांना झालेला उशिर यामुळे पिकांची वाढही खूंटली आहे. परिणामी पीके कोमेजली़ खरीप हंगामही हातचा जाण्याची आता चिंता आहे़ (प्रतिनिधी)कोरड्या दुष्काळाचे सावटजिल्ह्यात जुन ते आॅक्टोबर दरम्यान एकूण १५२८८.७६ मि.मी. तर सरासरी ९५५.५५ मि.मी.पाऊस पडतो. परंतु यंदा १९ आॅगस्टपर्यंत एकूण २६४२.९४ मि.मी. तर सरासरी १६५.१८ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. तर गतवर्षी १९ आॅगस्टपर्यंत एकूण १३४११.४७ मि.मी. तर सरासरी ८३८.९२ मि.मी.एवढा पाऊस पडला होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट ओढावले आहे.
खरीपाची पिके 'कोमात'
By admin | Updated: August 20, 2014 23:53 IST