नांदेड : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध १३ प्रकारच्या आरोग्य सेवा, आरोग्यविषयक जनजागृती या कार्यक्रमात नांदेड जिल्हा आरोग्य विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली. आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत माता व बालक सेवा, नवजात अर्भक सेवा, किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन व संतती प्रतिबंधक साधने सेवा, संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध व उपचार, ओपीडी व किरकोळ आजारावर उपचार, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, हृदयरोग या आजारांना प्रतिबंध, उपचार व मार्गदर्शन, वयोवृद्ध नागरिकांचे उपचार, मानसिक रोगावर उपचार व मार्गदर्शन, आयुष उपचार व योगा उपचार, दंतरोग प्राथमिक उपचार आदी सेवा पुरवल्या जातात. आरोग्यवर्धिनी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उपकेंद्राच्या ठिकाणी २९९ समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या सहकार्यासाठी एएनएम, आशा, एमपीडब्ल्यू हे उपकेंद्र स्तरावर कार्यरत आहेत.
नागरिकांना आरोग्य सेवा दिल्यानंतर केंद्र शासनाच्या एचडब्ल्यूसी पोर्टलवर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत दररोजच्या डाटाची नोंद करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय केंद्रामार्फत मासिक अहवालाच्या नोंदी घेण्यात येतात. या सर्व कार्यक्रमावर जिल्हास्तर, विभागस्तर व राज्य स्तरावरुन नियमितपणे देखरेख केली जाते. जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६५ तर उपकेंद्रात १ हजार ४८५ योगा सत्र घेण्यात आली तसेच प्रशिक्षणही घेण्यात आले. ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व २९९ उपकेंद्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रंगरंगोटी व नामफलक दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.
एकूणच या सर्व सेवा पाहता केंद्राच्या एचडब्ल्यूसी पोर्टलवर कामाची प्रतवारी दरमहा राज्य व केंद्र शासनाकडून कळविण्यात येते. नोव्हेंबर २०२०मध्ये नांदेड जिल्हा हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. उस्मानाबाद जिल्हा प्रथम तर अहमदनगर जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आरोग्य सभापती पद्माताई सतपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग काम करत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.
चौकट---------------
जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजितपणे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाचा नागरिकांना सेवा देण्यासाठी उपयोग होत आहे. या आरोग्य सेवेत सातत्य ठेवले जाईल. या संदर्भाने नियमितपणे सूचना दिल्या जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.