लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भारतात पहिल्यांदा मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणाथ भारतीय रेल्वेकडून दरवर्षी रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या सोहळ्यात वर्षभर उत्कृष्ठ कार्य करण्याऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये नांदेड विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दक्षिण-मध्य रेल्वे क्षेत्रीय कार्यालयात ६५ वा रेल्वे सप्ताह पुरस्कार सोहळा (जी. एम. अवाॅर्ड) ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. कोविडच्या प्रभावामुळे यावर्षी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्य कार्यक्रम सिकंदराबाद येथे झाला. हैदराबाद, सिकंदराबाद, गुंटकळ, विजयवाडा, गुंटूरसह नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते ‘महाव्यवस्थापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नांदेड रेल्वे विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेड विभागात १५ व्यक्तिगत तर २ सांघिक पुरस्कार देऊन कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नांदेड विभागाने दक्षिण-मध्य रेल्वेमध्ये क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. यावर्षी नांदेड रेल्वे विभागाला ३ शिल्ड (ढाल) मिळाल्या आहेत. ज्यामध्ये उत्कृष्ठ रेल्वे पटरी (बेस्ट ट्रेक), उत्कृष्ठ सुरक्षा (सेफ्टी) आणि नवकल्पना (इनोव्हेशंस) ही तीन शिल्ड सामील आहेत. उपिंदर सिंघ यांनी यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागभूषण राव यांच्यासह अन्य विभागीय रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी, महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात वर्ष २०१९-२० दरम्यान दक्षिण-मध्य रेल्वेने केलेल्या कार्याची माहिती दिली.