लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. नागपुरात रविवारी रेकॉर्ड २६ हजारांहून अधिक चाचण्या झाल्या. परंतु पुढील तीन दिवस चाचण्या रामभरोसेच राहणार आहेत. १२ आणि १४ एप्रिल रोजी सरकारी केंद्रांवर ‘आरटीपीसीआर’ चाचणी होणार नाही. तर १३ एप्रिल लोजी गुढीपाडव्यामुळे चाचणी केंद्र बंद राहतील. मनपाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. अचानकपणे चाचण्यांना ‘ब्रेक’ लावण्याचे नेमके कारण काय आणि संसर्ग बेलगाम झाल्यानंतर बाधितांमध्ये आणखी वाढ झाली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचे अहवाल मिळायला विलंब होत आहे. या ‘बॅकलॉग’ला पूर्ण करणे व इतर काही तांत्रिक कारणांमुळे सरकारी चाचणी केंद्रांवर सोमवार व बुधवारी केवळ ‘रॅपिड ॲन्टिजेन’ चाचणीच होईल. प्रशासकीय पातळीवर अधिकारी व मंत्रीदेखील चाचण्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ॲन्टिजेनच्या अहवालाला अंतिम मानले जाऊ शकत नाही.
लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करणार : आयुक्त
‘कोरोना’ चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे मेडिकल, मेयो, एम्स, नागपूर विद्यापीठातील प्रयोगशाळांवर ओझे वाढले आहे. यामुळेच चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. या प्रयोगशाळांचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी सोमवारी व बुधवारी सर्व ४२ शासकीय चाचणी केंद्रांवर केवळ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या होतील. केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले.