नागपूर : गोव्यातील शवागारांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील शवागारांमध्ये सुधारणा करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला केली आहे. तसेच शासनाला यासंदर्भात माहिती घेण्यास सांगून, संबंधित याचिकेवरील सुनावणी उन्हाळी सुट्यानंतर निश्चित केली आहे. सहयोग ट्रस्टने ही जनहित याचिका दाखल केली आहे. शवागारांत उंदीर, घुस, मुंगूस अशा कुरतडणार्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. यामुळे अनेकदा शव कुरतडण्याच्या घटना घडतात.
ही मनुष्य देहाची विटंबना असून, हे थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. सहयोग ट्रस्टने शवागारांचे निरीक्षण करून अहवाल सादर केला आहे. त्यात शवागार व शवविच्छेदन कक्षाच्या सुधारणेबाबत अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कार्य करणार्यांना ग्लोव्हज, मास्क, अॅप्रॉन व अन्य आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, कर्मचार्यांना वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे, शवविच्छेदनासाठी आधुनिक अवजार उपलब्ध करून देण्यात यावे, शवविच्छेदन कक्षात तक्रार पेटी, कचरापेटी व चौकशी खिडकी असावी, इत्यादी सूचनांचा अहवालात समावेश आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. स्मिता सिंगलकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)