जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : दस्तनोंदणीसाठी गर्दी करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्कात शासनाने वेळोवेळी सवलत दिली आहे. त्या सवलतीनुसार मार्च २०२१ अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नोंदणी अधिनियमाच्या कलम २३ नुसार दस्त निष्पादित झाल्यापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतील. तरी ‘कोविड १९’चा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता वरील तरतुदीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक, नागपूर यांनी कळविले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात अलीकडे गर्दी वाढली होती. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका होता. ‘लोकमत’ने या विषयाकडे २५ मार्चच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत ३१ मार्चपर्यत असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरिता नागपूर ग्रामीणमधील १२ दुय्यम निबंधक कार्यालयात सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. मार्च २०२१ मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून दस्त निष्पादित केल्याच्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येईल. तरी कोविड १९चा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता वरील तरतुदीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक, नागपूर यांनी केले आहे.