लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन पिढीमध्ये संविधानाप्रति जागृती वाढावी व त्यांना संविधानातील मूल्यांची सखोल ओळख व्हावी, या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. चारही विद्याशाखांमधील प्रत्येक अभ्यासक्रमात संविधानाचा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर संविधानाचे धडे देण्याचा मानस कुलगुरूंनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय परिसरात संविधान प्रास्ताविका पार्क साकारल्या जात आहे. विद्यापीठात दरवर्षी नियमित संविधान दिवसदेखील साजरा होत असतो; परंतु संविधानाचा मूळ गाभा, त्यामागील उद्दिष्टे व त्यातील बारकावे विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक झाले आहे. यासंदर्भात पावले उचलण्यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाकडून पत्रदेखील आले होते. विद्यापीठाने तातडीने यावर विचार सुरू केला. पर्यावरणाचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करण्यात येते. त्याच धर्तीवर संविधानाप्रति त्यांची जागृती वाढावी, या उद्देशाने आता संविधानाचा विषयदेखील सर्व अभ्यासक्रमांना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी यासंदर्भात अधिष्ठात्यांची बैठकदेखील बोलविली व त्यात एक आराखडादेखील तयार करण्यात आला आहे.
याअगोदर विद्वत्त परिषदेत असा प्रस्ताव मांडण्यात आला होता व तेव्हा परिषदेने त्याला तात्विक मान्यता दिली होती. सध्या अभ्यास मंडळच्या बैठकी सुरू आहेत. या बैठकांमध्ये संविधानाचा विषय अभ्यासक्रमात कशा पद्धतीने समाविष्ट करता येईल व त्याचा नेमका अभ्यासक्रम कसा असेल, यावर मंथन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरुंशी संपर्क होऊ शकला नाही.
गुणपत्रिकेत मिळणार ‘क्रेडिट्स’
यासंदर्भात कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांना संपर्क केला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राज्यपाल कार्यालयाकडून पत्र आल्यानंतरच कुलगुरुंनी याबाबत सकारात्मकता दाखविली होती. पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर नागपूर विद्यापीठातदेखील संविधानाचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात यावा, असा प्रस्ताव आम्ही कुलगुरूंना दिला. त्यांनी त्याला मान्यता दिली. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत या विषयाचे ‘क्रेडिट्स’ मिळतील व त्यांना याची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात येईल. लवकरात लवकर अभ्यासक्रमात याचा समावेश करण्याची सूचना कुलगुरुंनी दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.