नागपूरसह पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड
आनंद डेकाटे - नागपूर
नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीने राज्यालाच नव्हे तर देशाला आशेचे किरण दाखविले आहे. ज्या बेरोजगारीच्या संघर्षातून नक्षली घडतात त्या बेरोजगारीला संपविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याने राबविलेल्या पॅटर्नची आता सर्वांनीच दखल घेतली आहे. बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न आता होणार आहे. त्यासाठी राज्यातील पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली असून, यात नागपूरचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्हा उद्योगातही मागास आहे. परंतु या संकटातच समोर जाण्याचा मार्गही गवसला.
गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची योजना आखण्यात आली. या योजनेनुसार बेरोजगार युवकांची नोंदणी करणे. त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा शोध घेणे. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देणे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणे, अशी ही योजना होती. त्यासाठी खासगीस्तरावर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली. हॉस्पिटॅलिटी, आॅटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन असे तीन व्यवसाय निवडण्यात आले. या व्यवसायात ज्या बेरोजगारांमध्ये थोडेफार कौशल्य असेल त्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले. सर्वात अगोदर १४८३ बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करून त्यांचे कौन्सिलिंग करण्यात आले. त्यापैकी १२८२ उमेदवारांची टेस्ट घेण्यात आली. ९१४ उमेदवारांची प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यापैकी ४२४ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यातून ३७२ बेरोजगारांना नोकरी उपलब्ध झाली. हा एक छोटेखानी प्रयत्न गडचिरोलीत यशस्वीपणे राबविण्यात आला.
राज्य शासनानेसुद्धा याची गंभीरतेने दखल घेतली आहे. ‘गडचिरोली पॅटर्न’च्या धर्तीवर हा प्रकल्प आता संपूर्ण राज्यात लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या माध्यमातून नागपूर, औरंगाबाद, मुंबई, सांगली आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यासंबंधात लवकरच शासनातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात येणार आहे. असा असेल ‘कौशल्य विकास कार्यक्रम’ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना त्यांचे कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी प्रत्यक्ष खासगी आस्थापनाद्वारे त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे. गावपातळीवर जाऊन बेरोजगार तरुणांशी संपर्क साधणे, त्यांच्यातील व्यवसायाच्या दृष्टीने असलेल्या कौशल्याची माहिती करून घेणे. ते कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, याबाबत कौन्सिलिंग करणे, प्रशिक्षणाद्वारे त्याला नोकरीसाठी सक्षम करणे.