सुहास वाणी : ‘नीरी’त जुवारकर स्मृती व्याख्यान नागपूर : आजघडीला वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अन्नसुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही धोक्याची घंटी असून, यातून मार्ग काढण्यासाठी संशोधकांनी जास्तीतजास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत तेलंगणा राज्यातील पाटणचेरू येथील ‘आयसीआरआयसॅट’चे ( इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अॅरिड ट्रॉपिक्स) संचालक डॉ. सुहास वाणी यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित करण्यात आलेल्या डॉ. अशोक जुवारकर स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मुख्य वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित व संशोधन आणि विकास नियोजन विभागाचे प्रमुख प्रकाश कुंभारे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या काही काळापासून पाणी आणि जमिनीची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे अन्न उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यावर उपाययोजना शोधताना संशोधकांनी शेतकऱ्यांजवळ तंत्रज्ञानाचा हात नेला पाहिजे. शिवाय शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत अधिकाधिक प्रगत पद्धतींचा अवलंब झाला पाहिजे, असेदेखील डॉ. वाणी म्हणाले. दरम्यान, पडिक जमिनींची संख्या वाढत असून येथे सुपीक जमीन निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असे मत डॉ. हेमंत पुरोहित यांनी व्यक्त केले. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले तर जया सब्जीवाले यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)
नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
By admin | Updated: July 17, 2014 01:04 IST