लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी सर्वाधिक ७५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एक दिवसापूर्वीचच गुरुवारी ७४ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्युच्या या वाढत्या संख्येमुळे प्रशासनासह नागपूरकरही भयभीत झाले आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने आणि आयसीयू व व्हेंटिलेटरचे बेड मोजकेच असल्याने सर्वत्र धावपळ आहे.
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी ६१९४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. आतापर्यंत ६१०९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३,०९,०४३ वर पोहोचली आहे.शुक्रवारी सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे एकाच दिवशी तब्बल ५८९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील ३६१५, ग्रामीणमधील २२७९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २,३८,५९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी रिकव्हरी रेट ७७.६० टक्के नोंदविण्यात आला.
शुक्रवारी आढळून आलेल्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील ३७७९, ग्रामीणमधील २४०८ आणि जिल्ह्याबाहेरचे ७ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३७, ग्रामीणमधील ३१ आणि जिल्ह्याबाहेरचे ७ जण आहेत. जिल्ह्यात एकूण २५,५७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील १४,०९५, ग्रामीणमधील ११,४७८ जण आहेत. आतापर्यंत १९लाख ४१ हजार ९ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
चौकट
१४,०७९ कोरोना रुग्ण भरती
नागपूर जिल्ह्यात एकूण ६४,३३५ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ३९,५१७ आणि ग्रामीणचे २२,८१८ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १४,०७९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५०,२५६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मेडिकलमध्ये ८९३, मेयोमध्ये ५६५, एम्समध्ये ९६, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ९०, आयसोलेशन रुग्णालयात १६, आयुष रुग्णालयात ४१ रुग्ण भरती आहेत. इतर खासगी रुग्णालयात भरती आहेत.
मृत्यू वाढण्याची कारणे
रुग्णालयात बेडचा तुटवडा
व्हेंटिलेटर, आयसीयू बेड नाममात्र
गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाणे
होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन न करणे
रेमडेसिविर, फॅबी फ्लू, ऑक्सिजनची कमतरता.