नागपूर: शहरातील अनधिकृत लेआऊ ट नियमित करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे नागपुरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून याचे संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्र्यानाच आहे, असे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले. जाहिराती देऊन या निर्णयाचे श्रेय घेतल्याबद्दल मोघे यांनी भाजपवर त्यांचे नाव न घेता टीका केली.शहरातील अनधिकृत लेआट्सला नियमित करण्याचा निर्णय झाला. भाजप नगरसेवकांनी या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मोघे यांनी खुलासा करताना ज्याच्या कामाचे श्रेय त्यानेच घ्यावे असा टोला हाणला. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून तो गेल्याच वर्षी घेण्यात आला होता. त्याचे श्रेय त्यांनाच आहे, असे मोघे म्हणाले.नागपूर शहरात विविध भागात विविध कामांसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र या जागेवर एकूण १९११ ले-आऊट्स सध्या अस्तित्वात आहेत. त्यावर लोकांनी पक्की घरे बांधली. मात्र जागा आरक्षित असल्याने महापालिका किंवा सुधार प्रन्यास तेथे विकास कामे करू शकत नव्हती. त्यामुळे जागेचे आरक्षण रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इतरही पक्षांकडून वेळोवेळी केली. याची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आॅगस्ट २०१३ मध्ये ले-आउट्स नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. हरित क्षेत्रातील भूखंडधारकांचे विकास शुल्क दुप्पट करून व सार्वजनिक उपयोगासाठी राखीव जागांवरील आरक्षण वगळून ते नियमित करण्यासाठी नगर रचना विभागाचे उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने सर्वेक्षण करून ५० टक्के पेक्षा जास्त भागात बांधकाम असलेले ले आऊ ट नियमिती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दक्षिण,पूर्व, दक्षिण पश्चिम नागपुरातील सरासरी तीन हजार नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला.(प्रतिनिधी)
लेआऊट नियमित करण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना
By admin | Updated: July 11, 2014 01:16 IST