जिल्हा परिषद : पोषण आहाराचा दोन लाख विद्यार्थ्यांना लाभ नागपूर : प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते. गेल्या वर्षात जिल्ह्यातील १,९०,००० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. यासाठी २६ कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले. केंद्र व राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. मागील वर्षात जिल्हा परिषदेच्या १५८० व अनुदानित खासगी ३६९ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. ही योजना अधिक सक्षमतेने राबविली जावी, यासाठी योजनेतील त्रुटी, अडचणी व उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोषण आहार विभागाचे जिल्हा निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी दिली.या योजनेचा उद्देश सफल व्हावा, यासाठी तांदूळ व इतर साधनसामग्रीच्या साह्याने भिन्न प्रकारचे मेनू तयार केले जातात. शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना योजनेचा लाभ मिळावा, यादृष्टीने पोषण आहार विभागाने पुढील वर्षाचे नियोजन केले आहे. परिसरात उपलब्ध भाजीपाला व इतर बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर आहारात आवश्यक बदल करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल अशा स्वरूपाचा मेनू दिला जातो. सोबतच आहारातून आवश्यक ती प्रथिने व उष्मांक मिळतील याची खबरदारी घेतली जाते. पोषण आहारासाठी लागणारे इंधन व भाजीपाला पुरविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर होती. आता ती महिला बचत गटांवर सोपविण्यात आल्याची माहिती वाघमारे यांनी दिली. (प्रतिनिधी)
२६ कोटींचे अनुदान वाटप
By admin | Updated: July 10, 2014 00:46 IST