- श्री महाजनी
झाडाच्या झाडाभोवती गप्पांच्या मैफलींची संधी देणारा गावातला पार, चौसोपी वाडय़ांच्या मध्ये राखलेल्या अंगणातल्या विसाव्याच्या जागा, परसदारीचा खासगी अवकाश, वाडय़ाच्या ओसरीत टाकलेली आरामखुर्ची, मातीच्या भिंती आणि जमिनींना असलेली पावसाळ्या-हिवाळ्यातली ऊब आणि उन्हाळ्यातला गारवा..
हे सगळं कोणो एकेकाळी आपल्या घरांचं वैभव होतं आणि आपल्या आजी-आजोबांच्या, आई-वडिलांच्या पिढीच्या वाटय़ाला आलेलं (त्याकाळच्या तुलनात्मक गरिबीतलं) वास्तुवैभव!
- आपण आधुनिक झालो, शहरात सरकून गर्दी करीत राहिलो, मजल्यावर रचलेल्या मजल्यात घरांची घरटी बांधायची वेळ आली, शिवाय पैसे आले, त्यातून विकत घेण्याच्या वस्तू थेट परदेशातूनच आणण्याला श्रीमंतीचा साज चढला, तसे आपण बदललो आणि आपली घरंही!
नव्यामध्येही जुनं टिकवून धरण्याचा आग्रह ही अशा काळात मोठीच कसोटी असते. ती कसोशीने पार पाडणा:या आधुनिक वास्तुशिल्पींमध्ये होते चाल्र्स कोरिया! त्यांची आठवण काढताना आपण गमावलेल्या काही अवकाशांची आठवण अपरिहार्य आहे. त्यांना ंआठवणं म्हणजे आपल्या वास्तूंमधल्या हरवलेल्या विसाव्यालाच आठवणं!
हल्ली आधुनिक इमारत म्हटलं की, मोठमोठय़ा काचा लावलेली, चकचकीत मटेरिअल्सनी सजवलेली, विजेचे भरपूर प्रकाशझोत टाकून झळकावून टाकलेली अशी एखादी इमारतच आपल्या डोळ्यासमोर येते. नको त्या बाबतीत पाश्चात्त्यांचं अतिरेकी अनुकरण करत भारतातील मोठय़ा शहरांबरोबरच लहान लहान गावांमध्येही हल्ली अशा ‘आधुनिक’ पण निर्जीव इमारतींचं जंगल पसरू लागलं आहे. जागतिक एकत्रीकरणाच्या भरात आपण आपली ‘स्थानिक’, ‘पारंपरिक’ व ‘सांस्कृतिक’ ओळख विसरून जात आहोत.
या तीनही गोष्टींच्या पायावरच आधुनिक वास्तुशिल्पांची उभारणी हेच ज्येष्ठ वास्तुशिल्पी आणि विचारवंत चाल्र्स कोरिया यांचं जीवनध्येय होतं.
वास्तुरचनेत वास्तूचं अंत:रूप आणि बाह्यरूपाबरोबरच आजूबाजूचा परिसर, ज्या कारणासाठी वास्तुनिर्मिती होत आहे तो वास्तूचा प्रकार, जे लोक ती वास्तू वापरणार आहेत त्यांची मानसिकता, बांधकामाच्या पद्धती, त्यासाठी लागणारं बांधकाम साहित्य, हवा-प्रकाश यांचं सुयोग्य व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून कोरियांनी आधुनिक वास्तूंची एक नवीन शैली तयार केली.
वास्तुरचना करताना आकाश दिसणारी ओपन टू स्काय अंगणं, इमारतीस जोडून असणारे व्हरांडे, छपरांच्या इमारतींच्या बाहेर येणा:या वळचणी किंवा इमारतींवर सावल्यांचा खेळ करणारे ‘परगोले’ हे फक्त वास्तूच्या गरजेनुसार तपमान, प्रकाश व खेळते वारे निर्माण करणारे भाग नसून त्यामुळे इमारतीच्या वापराबरोबरच तयार होणा:या भागांमुळे जे दृक परिणाम होतात त्यामुळे एका वेगळ्याच चिरंतर अनुभवाची अनुभूती मिळते.
वापरताना आणि वास्तूतून वावरताना अनुभवास येणा:या अनेक रंगांच्या व सावल्यांच्या छटा, नैसर्गिक प्रकाशाचा समतोल, विचारपूर्वक वापरलेल्या भिंती व जमिनीवरील पोत, अचानक समोर येणारं अंगण आणि त्यातूनच येणारी वा:याची झुळूक असे अनेक अमर अनुभव वास्तू देऊ शकते. ते अनुभव हीच कोरियांनी रचलेल्या वास्तूंची खरी श्रीमंती!
एकाच जागेचा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करता येणं, ही वास्तुरचनेतली आणखी एक खुबी! वाडय़ातील अंगणं, घराबाहेरील बसायला असणारे कट्टे अशा गोष्टींचा वापर लोक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतात. जरी जीवनशैली बदलली तरी नवीन वास्तूतील अशी मोकळी अंगणं, वास्तूलगतचे चबुतरे, व्हरांडे, मोकळ्या जागा कोरियांनी रचलेल्या इमारतीत वापरता येतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक इमारतीत वा संकुलात आतल्या जागा बाहेरच्या वातावरणाशी जोडलेल्या आहेत. ह्या पूर्णपणो बंदिस्त, अंशत: बंदिस्त व पूर्णपणो उघडय़ा जागा एकमेकात इतक्या सहजतेने मिसळलेल्या असतात की त्या वास्तू कधीच रूक्ष वाटत नाहीत. त्यांच्या अस्तित्वातच एक जिवंतपणा असतो!
- हे सारं श्रीमंतांनाच परवडू शकेल, असं वाटेल. पण ते खरं नाही. मध्यम उत्पन्न गटातल्या लोकांसाठी बांधलेली छोटेखानी घरकुलंदेखील अशी जिवंत, झुळझुळती असू शकतात, हे कोरियांनी सिद्ध केलं.
बेलापूर, नवी मुंबई येथील त्यांचं गृहसंकुल पाहावं. अनेक घरांची एकत्रित रचना करताना घर व घरमालक यांच्याबरोबर शेजारी व संकुलातील इतर सदस्य यांचं एकमेकांशी भावनिक नातं आपसूकच जोडलं जाईल याचा विचार प्रामुख्याने केलेला आहे.
घरांमधील सामाईक अंगणं, त्यात उघडणारे प्रत्येक घराचे व्हरांडे, मध्यभागी असलेला झाडाचा पार अशा रचनेमुळे येता जाता एकमेकांशी भेटणं बोलणं होतंच, पण सकाळी ही सामाईक जागा मुलांना खेळायला उपयोगी पडते, दुपारी घरातील स्त्रिया एकत्र येऊन इथे गप्पा मारतात. संध्याकाळी वृद्ध किंवा कामावरून आलेली माणसं पारावर गप्पा मारत बसतात. त्यामुळेच संकुलातील रहिवासी एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. पाराबाजूची ही घरं कौलारू व्हरांडे असलेली असून, प्रत्येक घरावर छोटीशी परसबाग पण आहे. त्यामुळेच लांबलांबून पोटापाण्यासाठी मुंबईकडे आलेल्या लोकांना ही घरं ‘आपली’ वाटतात.
कोरियांनी साबरमती आश्रमातील ‘गांधी स्मारक संग्रहालय’ उभं केलं, तेही गांधीजींच्या विचारांचं जणू मूर्त रूपच! अत्यंत साधी रचना, उभ्या व आडव्या रेषांच्या आकृतिबंधात खुबींने योजलेल्या बंदिस्त व मोकळ्या जागा, पाण्याचा हौद व पाण्यामुळे गार होणारे वारे वास्तुतून व्यवस्थित फिरण्यासाठी केलेले लाकडी पट्टय़ांचे झरोके असं या स्मारकाचं स्वरूप आहे. गिलावा न केलेल्या विटांचं बांधकाम, मंगलोरी कौलांचं छप्पर आणि काळ्या फरशीची जमीन अशा मोजक्या मटेरिअलमध्ये केलेलं काम असूनहीे शुद्ध, पवित्र व सात्त्विक जागेची अनुभूती येते.
कोरियांच्या एकूण 57-58 वर्षाच्या व्यावसायिक कारकीर्दीत देश-विदेशात त्यांनी अनेक प्रकारच्या इमारतींच्या रचना केल्या. त्यात छोटी मोठी घरं, व्यापारी संकुलं, संगहालयं, हॉटेल्स, शैक्षणिक संकुलं, नाटय़गृहं, स्मारकं ह्या सगळ्या रचना आधुनिक असल्या तरी त्यांच्या साधेपणाबरोबरच प्रत्येक इमारतीला पारंपरिक वास्तुकलेची जोड त्यांनी आवजरून दिली.
पारंपरिक इमारतींमधील अंगणं, व्हरांडे, देवळाच्या बाजूच्या कमानी, ओस:या, राजस्थानी घरांपुढचे ओटले, भित्तीचित्रं, भिंतीचे पोत, नदीकाठीे बांधलेले घाट, पाय:यांच्या विहिरी अशा अनेक गोष्टींचे संदर्भ त्यांच्या रचनेत दिसतात.
वास्तुशिल्पी म्हणून फक्त वास्तूंशीच निगडित न राहता कोरिया यांनी नगररचनेमध्ये केलेलं काम खूप मोलाचं आहे, पण तो या लेखाचा विषय नाही.
कोरिया म्हटलं, की आठवतात त्या ‘हरवल्या’ जागांचं हे स्मरणच फक्त!
आता ते नाहीत.
- पण त्यांनी निर्माण करून ठेवलेले किती दिलासे आहेत आसपास!
- मोठमोठय़ा गगनचुंबी झगमगाटाला विटली की माणसं कदाचित त्याच आस:याला जातील पुन्हा.
- मग पायांना सारवलेल्या जमिनीचा स्पर्श हवासा वाटेल, वा:याची झुळूक यावी म्हणून एसीचं बटण दाबण्याऐवजी मागली-पुढली दारं उघडावीशी वाटतील, अंगणाची आठवण येईल, बाळाला मांडी-खांद्यावर घालून निजवताना त्याला रात्रीच्या आकाशातला चांदोबा दिसू दे असं वाटेल,
तेव्हा कोरिया आठवतील!
(लेखक सातारास्थित ख्यातनाम वास्तुविशारद आहेत)