संजय नहार
मलाला युसुफझाईला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी दूरचित्रवाहिन्यांवर आली आणि मला आनंद झाला. ही बातमी पाहात असताना, जम्मू-काश्मीरमधील जोगिंदरसिंग नावाचा मुलगा माझ्याशेजारी उभा होता. मलालाच्या वडिलांचं -झियाउद्दीन यांचे अभिनंदन करताना माझ्या डोळ्यांसमोर जोगिंदरसिंगचा प्रवासही ताजा झाला.
जून २0१२ मधील एके दिवशी मला भारताचे तेव्हाचे आरोग्यमंत्री व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा फोन आला, ‘‘एका कुटुंबातील १५ जणांची काही वर्षांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती, देशासाठी सर्वोच्च बलिदान करणार्या त्या कुटुंबातला एक मुलगा जोगिंदरसिंग याला शिकून काही करायची इच्छा आहे. हा मुलगा मोठय़ा धाडसाने माझ्या एका सभेत आला आणि शासनाने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली. त्याला पुण्यात तुम्ही पुढील शिक्षण द्यावे, ही विनंती आहे.’’ हा मुलगा त्यांच्या मतदारसंघातला असल्याने त्यांनी विशेष आस्थेने त्यासाठी आग्रह केला.एकाच कुटुंबातील इतके लोक शहीद होण्याची जम्मूमधील दोडा जिल्ह्यातील थाथटी तालुक्यातील लेहोटा गावातील १९-२0 जुलै १९९९ मधील घटना, त्यावेळी खूपच गाजली होती.
१९ जुलै १९९९ च्या रात्रीपासून २0 जुलै १९९९ या दिवशी पंधरा तास दहशतवाद्यांशी जोगिंदरसिंग यांच्या कुटुंबाने दिलेला लढा, घरातील पंधरा लोकांचे बलिदान आणि ५ लोक गंभीर जखमी झालेल्या कुटुंबाने तीन दहशतवाद्यांना ग्रामसुरक्षा कमिटीच्या माध्यमातून मिळालेल्या बंदुकांतून पंधरा तास संघर्ष करून कंठस्नान घातले, ती घटना लष्कर आणि प्रशासनाचे अधिकारी अजूनही विसलेले नाहीत.
त्या वेळी जोगिंदरसिंग केवळ ४ वर्षांचा होता. गोळीबार सुरू असताना, त्याला बहिणीने मागे फेकून दिले, म्हणून त्याचे प्राण वाचले. त्यांच्या कुटुंबीयातले जे सदस्य वाचले, त्यांना केंद्र सरकारने शौर्यपदक प्रदान केले, तर चुलतभाऊ अमरिकसिंगला पोलिसात भरती केले आणि जोगिंदरसिंगला जम्मूमधील एस.ओ.एस. बालग्राममध्ये भरती केले. त्यांच्या नियमाप्रमाणे दहावीनंतर त्याला तिथे ठेवता येत नव्हते. म्हणून पुढील शिक्षणासाठी आम्ही पुढाकार घ्यावा, अशी विनंती आझाद यांनी करताच, मी क्षणाचाही विलंब न लावता ही जबाबदारी स्वीकारली. त्याप्रमाणे जोगिंदरसिंग पुण्यात आला. इतकी भयानक घटना घडूनही आणि ती त्याला पूर्णपणे आठवत असूनही, त्याच्या मनात कोठलीही सूडाची भावना नव्हती. अगदी हसरा चेहरा. चेहर्यावर कोणाबद्दलही आकस नाही. मी सहज म्हटले, ‘‘जोगी, आपके साथ क्या हुआ है, आपको याद है?’’ तो म्हणाला, ‘‘याद है। मेरी दादी प्रेमादेवी, पापा मोहनलाल, माँ दलीपादेवी, मेरे सगे भाई नरेशकुमार और सतीशकुमार, मेरे तीनों सगे चाचा शिवलाल, किशनलाल, लेखराज, उनके बेटे, मेरी चाची, सबको आतंकवादीयों ने मारकर उनकी लाशें.. और वो सारी घटना मुझे आज भी याद हैं। मेरी दीदीने मुझे उठाकर फेक दिया इसिलिए मैं बच गया। ’’ मला आश्चर्य वाटले. खरे तर आपल्या कुटुंबातील कोणी मारले गेले, तर बदला घेण्याची भावना सामान्यपणे असतेच. पण जोगिंदरसिंग मात्र भविष्याकडे पाहत होता. त्याचा एक चुलतभाऊ अमरिकसिंग सध्या जम्मू-काश्मीर पोलिस दलात आहे. त्या संघर्षाची त्याने सांगितलेली कथा ऐकून रोमांच उभे राहतात.. तो सांगतो, ‘‘लेहोटा हे आमचे गाव म्हणजे कधीही गोळीबार होऊ शकतो आणि अतिरेक्यांनी यापूर्वीही वेळोवेळी अनेकदा गंभीर हल्ले केले होते असे हे गाव. म्हणूनच या अतिरेक्यांशी संघर्ष करण्यासाठी तयार झालेल्या ग्रामसुरक्षा दलामध्ये आमचे सर्व कुटुंबीय सदस्य झाले होते आणि दहशतवाद्यांचा सामना करण्याचे प्रशिक्षण आणि बंदुका आमच्याकडे दिल्या गेल्या होत्या. अशातच १९ जुलै १९९९ या दिवशी आमच्या लेहोटा गावात दिवसभर शेतीचे काम संपवून आम्ही घरात होतो. गावात आमची सहा-सात घरे होती. रात्री साडेनऊच्या सुमारास घरांवर गोळीबार होऊ लागला. ग्रामसुरक्षा दलाचे आमचे दोन सहकारी गोळीने प्रत्युत्तर देत होते. दलाचे गावात नऊ सदस्य होते. थोड्या वेळाने आमचे पाच सहकारी मृत्युमुखी पडल्याचे दिसले. आमच्याकडे नऊ बंदुका होत्या. त्यातून माझा चुलतभाऊ सुरजितसह आम्ही गोळीबार करूलागलो. महिला, जोगिंदरला या घटना कळत होत्या तो आणि इतर लहान मुलेही आमच्या सोबत होती. ज्येष्ठ नागरिक मिळेल त्या आडोशाला लपले. मुले आम्हाला बंदूक आणि गोळ्या आणून देत होती. तब्बल पंधरा तास आम्ही दहशतवाद्यांशी लढत होतो. त्यांच्यापैकीही तीन जणांना आम्ही कंठस्नान घातले. हे आम्हाला नंतर कळले. इतका वेळ झुंजल्यावर दुसर्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास पोलीस, लष्कर पोचले. तोपर्यंत आमच्या घरातील पंधरा जणांची हत्या झाली होती. आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते.
‘‘केंद्र सरकारने आमच्या लढय़ाची दखल घेतली. सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांनी आमची भेट घेतली. मला आणि माझ्या भावाला घटनेनंतर अवघ्या पाच दिवसांत पोलिसांत भरती केले. तेव्हा बरीच काही आश्वासने मिळाली होती, पण फारशी पूर्तता झाली नाही. माझा चुलतभाऊ राजेंद्रकुमारने शिक्षण अर्धवट सोडले, तर त्याचाच सख्खा लहान भाऊ जोगिंदर अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याला तरी शिक्षण मिळावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा होती; मात्र मार्ग सापडत नव्हता. कारण आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मजुरी करून कुटुंबीय आजही जगत आहेत. अशातच गुलाम नबी आझाद यांची सभा दोडामध्ये असल्याचे कळले, आणि जोगिंदरसिंग गुलाम नबी आझाद यांच्या सभेत सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘सरहद’ संस्थेत शिकू लागला. तो लहानपणापासून अभ्यास करून मोठे व्हायचे, समाजासाठी काम करायचे अशी स्वप्ने पाहात असतो.’’
‘‘मला खूप शिकायचे आहे’’, असे सांगणारा गोड जोगिंदर माझ्या घरी काश्मिरी मुलांबरोबर राहू लागला. त्यांच्यापैकी काही जणांमध्ये सरकारबद्दल, भारताबद्दल राग असायचा. जोगी त्यांना सांगू लागला, ‘‘माझ्या घरातले एक- दोन नाही पंधरा लोक मारले गेले, पाच गंभीर जखमी झाले. आता कोणी माझी काळजी करीत नाही. बोलायला सगळे असतात. आम्हाला स्वातंत्र्यदिवस आणि काही विशिष्टप्रसंगी खूप सन्मानाने वागवले जाते. पण इतर वेळी कोणी विचारायला येत नाही. म्हणून राग मानून चालेल का? शेवटी प्रत्येकाला अडचणी असतात. त्यांचे काही प्रश्न असतात. जगात आनंदी आणि सर्वसुखी कोणी नसतो. तरीही बंदूक किंवा बदला हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. आपण सर्वजण शिकू, नाव कमवू. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करूआणि आपल्या राज्याचे, देशाचे आणि बांधवांचे भले करू आणि कोणावर राग काय धरायचा!’’
आता या घटनेला अडीच वर्षे होत आली. जोगिंदर सरहद महाविद्यालयात एफ.वाय. बी. कॉम.ला आहे आणि जम्मूतील बांधवांच्या भविष्यासाठी यशाशक्ती काम करू लागला आहे. पूर आला तेव्हा जम्मू काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी जोगी अहोरात्र काम करत होता.
पाकिस्तानच्या मलाला युसुफझाईची कथा खरंच शौर्यकथा आहे. जगातील मुलींना प्रेरणा देणारी. मात्र पाश्चात्त्य राष्ट्रांनी तिला जगभर प्रोजेक्ट केले. तिचे वडील झियाउद्दीन यांच्याशी माझा बर्याचदा संपर्क झाला. ते म्हणाले, ‘‘तिची मुलाखत, वेळ, भेट सर्व आता अमेरिकन संस्था व युनो पाहते.’’ मला जोगीची मलालाशी तुलना करायची नाही; मात्र मलालाचे वडील, आई आणि मलाला एकत्र असतानाचे दृश्य पाहात असताना जोगीला काय वाटत असेल? जोगिंदरसिंग मला मलाला युसुफझाईपेक्षा कोठेही शौर्याला कमी वाटला नाही. तिच्या श्रेष्ठत्वाला सलाम करतानाच जोगीमुळेही मन -------- पूर्ण कुटुंब मारले जाऊनही हिंदू-मुस्लिम ऐक्यावर बोलणारा, ‘दहशतवाद अथवा हिंसाचार तुमच्या आईवडिलांपासून तुम्हाला तोडतो. तेव्हा तुम्हाला कळेल त्यांची काय किंमत आहे’ हे सांगणारा, आई, वडील, भाऊ यांची आठवण झाली, की बंद खोलीमध्ये जाऊन ओक्साबोक्सी रडणारा; मात्र समाजासमोर जाताना सदैव हसणारा आणि सतत कामात रमणारा हा जोगिंदरसिंग. ‘हैदर’सारखे चित्रपट तो संवेदनशीलतेने पाहतो, त्याला संगीत आणि नृत्याचीही आवड आहे. ‘बंदूक हे उत्तर नाही, विकास करून पुढे गेले पाहिजे’, असे सांगणार्या जोगीचा चेहरा पाहिला, की माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात.. जोगी ते पाहतो आणि म्हणतो, ‘‘सरजी, मुझे घरवालों की याद नहीं आती, आप जो है मेरी माँ और पिताजी की जगह, और जिनके साथ मैं रहता हूँ वो काश्मिरी भी तो मेरे भाई है।’’
असा हा हिंदूंना मुस्लिमांशी, जम्मूला काश्मीरशी, जम्मू-काश्मीरला भारताशी जोडणारा, तरीही भारताला सर्वोच्च मानणारा, तिरंग्याचा खरा सन्मान करणारा जोगी आज आमच्याही जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आपल्याप्रमाणे इतर कोणी अनाथ होऊ नये आणि आपल्या आई आणि बहिणींप्रमाणे कोणी विधवा होऊ नये, यासाठी आपले आयुष्य घालविण्याचे जोगिंदरने ठरविले आहे. ‘सरहद’चा तर तो अविभाज्य भाग झाला आहेच; पण त्याच्याशिवाय कुटुंब ही कल्पना आता आम्हालाही अवघड वाटते, इतका मला, माझ्या पत्नीला- सुषमाला आणि आमच्या कुटुंबातील सर्वांना त्याचा लळा लागला आहे. जे जे त्याला भेटतात, त्यांनाही तो आपलंसं करतो. हिंसाचारानं होरपळलेला हा कोवळा जीव संवेदनेचे आणि आशेचे अंकुर जपत, जागवत हसत असतो.
(लेखक सरहद्द संस्थेचे संस्थापक
अध्यक्ष आहेत.)