कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या मोबाइल संभाषणामध्ये ‘दोन डोकी उडविली आहेत,’ असे याआधी पुढे आले होते. ‘आता नाशिकमधील कुंभमेळ्यात गोदावरी नदीमध्ये दोन डुबक्या मारून येतो,’ असेही तो मित्र सुमित खामकर याच्याशी बोलल्याचे मोबाइल संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. या दोन्ही संभाषणांचा संदर्भ पानसरे हत्येच्या घटनेशी आहे. त्याचा तपास होणे आवश्यक आहे, असा यक्तिवाद सरकारी वकिलांनी शनिवारी केला. समीर याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी १६४ साक्षीदारांकडे चौकशी केली; त्यामध्ये पनवेल येथे आश्रमात राहणारे अजयकुमार प्रजापिता यांच्याकडून मोबाइल दुरुस्तीसाठी आणल्याचे समीरने सांगितले. त्यानुसार पोलीस अजयकुमार यांच्या शोधात आहेत. फोंडा-गोवा येथे राहणारी मैत्रीण श्रद्धा पोवार व मित्र सुमित खामकर या दोघांबरोबर पानसरे हत्येसंदर्भातील मोबाइल संभाषण प्राप्त झाले आहे. त्यांच्यापर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत, असे यावेळी तपास अधिकारी चैतन्या यांनी सांगितले.समीरकडून मोबाईलची ३१ सीमकार्ड जप्त केली आहेत. त्यावरून त्याने कोणाशी आणि कधी संपर्क साधला, त्याबद्दल तपास करायचा आहे; त्यामुळे गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी बाजू सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी मांडली. संशयित गायकवाड याच्या वतीने सांगली येथील अॅड. एम. एम. सुहासे आपल्या युक्तिवादात म्हणाले, समीरच्या आवाजाचे नमुने जुळले म्हणजे त्यानेच खून केला आहे, असे नाही. ज्या कारणासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून घेतली त्याचा तपासच पोलिसांनी केलेला नाही. रुद्र आणि समीरचा काहीही संबध नाही. २३ मोबाईल आणि ३१ सीमकार्ड मिळाली आहेत. मग पुन्हा कोठडी कशाला हवी आहे, अशी विचारणही त्यांनी केली. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून प्रथम वर्ग न्यायाधीश वैशाली व्ही. पाटील यांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालय परिसरात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)
दोन डोकी उडवली, आता गोदावरीत डुबकी मारतो!
By admin | Updated: September 27, 2015 05:52 IST