शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

तेजसचा तेजोभंग - चांगल्या गोष्टींची आपली लायकी आहे का?

By admin | Updated: May 25, 2017 14:15 IST

आपल्याला काय काय मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत हे आपण उगाळत असतो, परंतु त्याच राज्यघटनेने ज्या दमात अधिकार दिलेत त्याच दमात कर्तव्यांची जाणीवही करू दिली आहे, हे आपण विसरतो

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
तेजस या मुंबई गोवा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या आरामदायी गाडीच्या पहिल्याच फेरीमध्ये अनेक समाजकंटक प्रवाशांनी तोडफोड केल्याचे दिसून आले आहे. एलईडी चोरण्याचा प्रयत्न केला, ते जमलं नाही म्हणून ते फोडले, हेडफोन्स लंपास केले. ही गाडी मुंबईत दाखल झाली तीच मुळी वाटेत लोकांनी मोठ मोठे दगड मारून काचा भंगवलेल्या अवस्थेत. काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न केला जात असताना, त्याला समाजातल्या विध्वंसकांकडून अशा नाट लावण्याच्या घटना घडतात आणि भारतीय लोकांची लायकी अशा चांगल्या गोष्टींचा लाभ घेण्याची आहे का असा प्रश्न पडतो. जशा जशा चांगल्या गोष्टी आपल्या समाजात घडत गेल्या तसं तसं विध्वंसक आणि अत्यंत खालच्या स्तरावरील वागणुकीचं दर्शनही लगोलग घडत गेल्याचं आपल्याला दिसून येईल.
काही वर्षांपूर्वीपर्यंत लांब पल्ल्याच्या ट्रेनमधल्या संडासांमध्ये टमरेल ठेवलेलं असायचं. ती टमरेलं लोकं चोरत, म्हणून रेल्वेनं तिला लोखंडी साखळी बांधली, तर साखळीसकट टमरेलं चोरली जायला लागली, म्हणून शेवटी रेल्वेनं संडासांमध्ये टमरेलं ठेवणंच बंद केलं. आता अगदी एसी कंपार्टमेंटचं तिकिट असलं तरी शौचाला जाताना रिकामी झालेली पाण्याची प्लॅस्टिकची बाटली घेऊन जावं लागतं. काही वर्षांपूर्वी रेल्वेतल्या वॉश बेसिनवरच्या आरशांवर असं चक्क मध्यभागी एम्बॉस केलेलं असायचं, की हा आरसा रेल्वेमधून चोरलेला आहे. असं लिहिण्याचा उद्देश एवढाच की कुठल्याही चोरट्याला तो वापरता येऊ नये.
 
 
प्रत्येक बिल्डिंगच्या जिन्यांचे कोपरे हे थुंकीसंप्रदायांना आंदण दिल्यासारखेच असतात. अखेर जिन्यांमध्ये लोकांनी पानाच्या पिचकाऱ्या मारू नयेत, म्हणून आपल्याच इथल्या काही हुशार लोकांनी राम कृष्ण हनुमान आदी देव-देवतांच्या टाइल्स जिन्याच्या कोपऱ्यांमध्ये लावायला सुरूवात केली. स्वच्छ असलेले जिने व कोपरे खराब करू नयेत इतकी साधी अक्कल नसलेले भारतीय देवदेवतांचे फोटो पाहिल्यावर थुंकायच्या जागा बदलायला लागले एवढंच. बरं असंही नाही अस्वच्छतेच्या किंवा नागरी कर्तव्ये न पाळण्याच्या बाबतीत अशिक्षित आघाडीवर आहेत आणि सुशिक्षित नाहीत.
 
 
तेजसची तोडफोड करणाऱ्यांमध्ये व जिन्यांमध्ये पानाच्या पिचकाऱ्या मारणाऱ्यांमध्ये दोघेही खांद्याला खांदा लावून आहेत. लिहिता वाचता आलं म्हणजे माणूस शिकला असं होत नाही, तर चांगल्या आचार विचारांसाठी संस्कार महत्त्वाचे असतात, आणि घरात केर काढायचा आणि खिडकीतून तो बाहेर टाकायचा हाच संस्कार बहुसंख्य भारतीयांवर झालेला आज दिसतोय. बहुतेक सगळ्या शहरांमध्ये, निमशहरांमध्ये व गावांमध्ये कुठल्यातरी छपरी लोकल दादापासून ते पंतप्रधानांपर्यंतच्या राजकारण्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग लागतात. पेपरांमध्ये क्लासच्या जाहिरातीत जसे गुणवान मुलांचे फोटो झळकतात, तसे स्टॅंपसाईजचे शेकडो शुभेच्छुकांचे फोटो अशा होर्डिंगवर असतात, अख्खं शहर आपण विद्रूप करतोय याची पुसटशी शंकाही या महाभागांना नसते. इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या वा टेलिफोन खात्याच्या बॉक्सपासून ते रेल्वेच्या भिंतीपर्यंत तर पोस्टर्सचा उच्छाद असतो. वशीकरण, मूठकरणी सारखे इलाज करणाऱ्या बाबांपासून ते झुरळांपासून मुक्ती देणाऱ्या पेस्ट कंट्रोल कंपन्या इतकी या जाहिरातींची रेंज असते. अशा पोस्टर्समुळे सगळं वातावरण किती घाण होतं याचं भान ना जाहिरात करणाऱ्यांना असतं, ना त्या सोसणाऱ्या जनतेला कारण अशी विद्रूप चिकटवाचिकटवी हा आपल्या सामान्य जीवनाचा भाग व्हावीत इतकी सर्रास आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाला निर्माल्य वाहून विहिरींचं, खाड्यांचं रुपांतर आपण घाण नाल्यात करतोय हे ही आपल्याला समजत नाही आणि प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती वापरू नका असा संदेश देणारे प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासूनच बनलेल्या ख्यातनाम राजापुढे भाविक होऊन नतमस्तक होतात आणि त्यात त्यांना काही विरोधाभासही वाटत नाही. दोन पाच दिवस घरात भक्तिभावानं पुजले गेलेल्या गणपतीच्या मूर्ती विसर्जनानंतर तुटल्या फुटल्या अवस्थेत किनाऱ्याला लागतात, आणि उत्तरपूजा झाल्यामुळे त्यात आता परमेश्वराचा अंश नसल्याचे आपण निर्लज्जपणे सांगतो, परंतु समुद्राची वा खाडीची वा नदीची आपण दुर्दशा केलीय हे आपल्या खिजगणतीतही नसतं.
 
 
काही दशकांपूर्वी घर वगळता कुठेही शौचालयांची सोय नव्हती. बस किंवा रेल्वे स्थानकांसारखे मोजके अपवाद वगळता सार्वजनिक शौचालये दुर्मिळ होती आणि रेल्वे किंवा बस स्थानकांमध्ये शौचाला जाण्यापेक्षा काही तास शौचालाच होणार नाही अशा गोळ्या घेण्याकडे लोकांचा कल असायचा. अशा काळात सुलभ शौचालयं सुरू झाली आणि ही गरज बऱ्यापैकी भागली. परंतु, आपण काय केलं तर बसल्या बसल्या दरवाजांवरती विकृत कामशास्त्र लिहिलं, दरवाजांना सिगारेटचे चटके देऊन विद्रूप केलं आणि हिंग लावून न विचारणाऱ्या मुलींचे फोन नंबर कॉल गर्ल्स म्हणून लिहून त्यांचं जगणं नकोसं केलं. चांगल्या शौचालयांची आपण केलेली अवस्था बघून काही भारतीयांची लायकी रेल्वे ट्रॅकच्या किंवा गटाराच्या बाजुला दगड उडवत बसण्याचीच आहे असं वाटलं तर काय चूक?
उठसूठ, भारतीय राज्यघटनेच्या कलमांची उजळणी आपण करत असतो आणि आपल्याला काय काय मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत हे आपण उगाळत असतो, परंतु त्याच राज्यघटनेने ज्या दमात अधिकार दिलेत त्याच दमात कर्तव्यांची जाणीवही करू दिली आहे, हे आपण विसरतो. तेजस एक्सप्रेस सादर करताना रेल्वे अधिकाऱ्यांना वाटलं असेल की लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करू, एलईडी डिस्प्लेवर लोकं गाणी ऐकतिल, मुलं खेळतील. वातानुकूलीत डब्यात त्यांची डोकी शांत राहतील आणि ते शांततेनं प्रवासाचा आनंद घेतील. पण, रेल्वे प्रशासनाला इतक्या अनुभवांवरून लक्षात आलं असेलच की भारतीय प्रवाशांची लायकी फार काही चांगलं द्यावी अशी नाहीये, ते चोचले डेक्कन ओडिशी वगैरेच्या माध्यमातून केवळ पाश्चात्य देशांतील प्रवाशांचे पुरवावेत, कारण कदाचित फक्त त्यांच्यावरच पब्लिक प्रॉपर्टीची कदर ठेवण्याचे संस्कार असतात.