धक्कादायक! कुत्र्याचं नख लागल्याने रेबीज, सहा महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:49 IST2026-03-24T17:48:06+5:302026-03-24T17:49:17+5:30
नालासोपारा येथून अत्यंत वेदनादायी आणि धक्का देणारी घटना समोर आली आहे.

धक्कादायक! कुत्र्याचं नख लागल्याने रेबीज, सहा महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू
नालासोपारा येथून अत्यंत वेदनादायी आणि धक्का देणारी घटना समोर आली आहे. रेबीजच्या संसर्गामुळे अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
कशिश सहानी असे या निष्पाप मुलीचे नाव असून ती नालासोपारा पश्चिमेतील सुबोध सागर इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती मदर मेरी शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी आजोबांसोबत जात असताना एका भटक्या श्वानाच्या नखाने तिच्या हाताला जखम झाली होती. दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र इंजेक्शनच्या भीतीमुळे ती अस्वस्थ झाली आणि उपचार पूर्ण होऊ शकले नाहीत. जखम लवकर भरल्याने पुढे त्याकडे दुर्लक्ष झाले.
मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती अचानक खालावली. अन्न-पाणी घेणे बंद झाले, डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसू लागला. परिस्थिती गंभीर होताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले, पण डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही तिचे प्राण वाचू शकले नाहीत. वैद्यकीय अहवालात रेबीज संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेने परिसरातील नागरिकांना मोठा मानसिक धक्का बसला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या श्वानांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट देत प्रशासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आगामी मनपा सभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर मनपाच्या आरोग्य विभागानेही सतर्कता दाखवत संबंधित मुलीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, श्वान किंवा मांजर चावणे अथवा नख लागणे ही बाब अजिबात दुर्लक्षित करू नये. त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः लहान मुलांना इंजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे ते अनेकदा अशा गोष्टी लपवतात. अशावेळी पालकांनी मुलांशी विश्वासाने संवाद साधून त्यांना योग्य वेळी उपचार मिळतील याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आव्हानही मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.