मुंबई : काच फुटण्याच्या भीतीने अनेक वस्तू या प्लॅस्टिकच्या वापरल्या जातात. हेच प्रमाण मानून द्रव औषधांसाठीही प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्रासपणे वापरल्या जातात. मात्र औषधांसाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या होणाऱ्या वापरामुळे ते आरोग्यास घातक ठरू शकते, असे अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनांतून समोर आले आहे. यामुळेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘अॅक्ट इंडिया’ अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गतच लहान मुले, वृद्ध तसेच गरोदर महिला आणि प्रजननशील वयोगटातील महिलांसाठीच्या औषधांची प्राथमिक साठवणूक पॉलिथिलिन टेरेफॅलेट्स किंवा प्लॅस्टिक कंटेनर्समध्ये करण्यास प्रतिबंध करण्याची शिफारस ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायजरी बोर्डने केली आहे. या प्लॅस्टिक बॉटल्सच्या २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानात असल्यास विशिष्ट तपासण्या केल्या जातात. भारतात सर्वसाधारण तापमान हे २० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. या बाटल्यांमध्ये औषध दीर्घकाळ साठवल्याने त्यात विषारी घटक उतरतात. प्लॅस्टिकचे विघटन होण्यास ३०० वर्षे जावी लागतात. काच कशातही मिसळत नसल्याने काचेच्या बाटल्या वापरणे योग्य ठरते, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्लॅस्टिकमधील औषधे घातक !
By admin | Updated: December 8, 2014 03:00 IST