वाशिम : सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या वाशिम तथा हिंगोली जिल्ह्यांतील दोन शेतकऱ्यांनी दीड एकरात चंदनाच्या सहाशे वृक्षांची लागवड करून श्रमशेतीचा आदर्श ठेवला आहे.मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याचा पट्टा सदैव अवर्षणग्रस्त म्हणून गणला जातो. कमकुवत आर्थिक स्थिती तसेच शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन, हरबरा आदी पारंपरीक पिकांवरच समाधान मानतात. अशा परिस्थितीत वाशिम जिल्ह्यालगत असलेल्या कडोळी येथील युवा शेतकरी सुनिल कदम व संतोष भादलकर यांनीत्यांच्या दीड एकर संयुक्त शेतीमध्ये चंदनाच्या रोपांची लागवड केली. त्यांच्याकडे आठ एकर बागायती शेती आहे. ठिंबक सिंचनाची सोय आहे. या युवा शेतकऱ्यांनी याआधी सोयाबीन, हरभरा यासारखी पारंपरीक पिके घेतली. परंतु त्यातून फारसे काही हाती लागत नसल्यामुळे लातुर येथील शेतकरी बगदुरे यांच्या मार्गदर्शनानुसार गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तुलनेने नगण्य पाणी लागणाऱ्या चंदनाची रोपे लावली. त्यामुळे आता त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.चंदन परजीवी असल्यामुळे या रोपांजवळ त्यांनी तुरीचे झाड लावले. रोपे लावल्यापासुन रोपांची नियमित काळजी, वेळेच्या वेळेला पाणी, खत याची फलश्रुती म्हणून आजच्या घडीला ही चंदनाची रोपे तब्बल ७ ते ८ फूट उंच वाढली आहेत. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणीचंदन रोपांना अन्य पिकांच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्केच पाणी द्यावे लागते. इतर देशांतील चंदनाच्या तुलनेत भारतातील चंदनाच्या झाडात सुगंध व तेलाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे भारतीय चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. भारतात चंदनाच्या सुगंधी गाभ्याची किंमत सहा ते आठ हजार रुपये प्रतिकिलो आहे. १५ वर्षांत चंदनाच्या झाडाची पूर्ण वाढ होते. पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या एका झाडापासून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न प्राप्त होते.
दीड एकरात चंदनाचा दरवळ!
By admin | Updated: July 11, 2016 05:45 IST