ऑनलान लोकमत
मुंबई, दि. २९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेत पुढेच असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हेदेखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते. तर देशाला विकासाच्या दिशेकडे नेण्यात नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी मोलाची भूमिका बजावली होती अशी आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यावर मंगळवारी सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. मोदी हे परदेशात लोकप्रिय असून ते अधिक वेगाने देशाला पुढे नेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी मोदींचे अभिनंदनही केले आहे. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस नेत्यांचे कौतुक केले आहे. सोशल मिडीया, प्रसारमाध्यम हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळातही पं. नेहरु, इंदिरा गांधी व राजीव गांधी हे परदेशात लोकप्रिय होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. देश बिकट अवस्थेत होता त्यावेळी देशाच्या आर्थिक विकासाचा पाया नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनीच रचला होता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले. विदेशी कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आमच्या माणसांचे फळबाग व शेती संपवू देणार नाही, परदेशातील कचरा आमच्या तोंडावर मारण्याचा धंदा घातक असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.