कल्याण : कल्याणमधील दुधनाका मोहल्लयामधील रहिवासी असलेल्या व मे महिन्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेलया चार युवकांपैकी एकाने महिन्याभरापूर्वी आपल्या कुटुंबियांशी इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता अशी, माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. मात्र, पोलीस यंत्रणा त्याचा तपास करीत नसल्याने तो सीबीआयकडे अथवा एनआयएकडे सोपवावा, अशी मागणी कल्याणकर करीत आहेत. ही मुले जर दहशतवादी संघटनांशी संबंधित असतील तर ती नेमकी कोणत्या देशात आहेत व काय करीत आहेत हे जर गुप्तचर यंत्रणेला समजू शकत नसेल तर याहून मोठी नामुष्की नाही अशी टीकाही या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे चिंतन जोशी यांनी केली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.जोशी यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार त्या चौघांपैकी एकाच्या कुटुंबियांनी मे महिन्यातच तातडीने पोलिसांना घडला प्रकार सांगितला होता.त्यानंतरही स्थानिक पोलिसांनी काणाडोळा केल्याने जोशींनी स्वत:ही डीसीपींना निवेदन देऊन या बाबतची चौकशी तातडीने करावी असे म्हंटले होते. त्यासही आता महिना उलटला असून पोलिस यंत्रणेने काहीही न केल्यानेच त्यांचा आता काहीच थांगपत्ता लागत नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
एकाने साधला बगदादहून कुटुंबीयांशी संपर्क
By admin | Updated: July 16, 2014 03:12 IST