मुंबई: विवाहसमारंभात जेवण तयार करताना आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने रागावलेल्या कॅटरर्सच्या कामगाराने दोघा आचार्यांवर चाकूने हल्ला करण्याची घटना आज गिरगाव परिसरात घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे.अन्वर शेख (३५)असे आरोपीचे नाव असून तो गिरगाव परिसरातील सीपी टँक येथील एका कॅटरर्सकडे लेबरचे काम करतो. याच कॅटरिंगमध्ये सुरज पटेल (२२) आणि त्याचा मामा रमेश चौधरी(४५) हे आचारीचे काम करतात. मंगळवारी मालाड परिसरात एका विवाहसमारंभासाठी भोजन तयार करण्याची ऑर्डर त्यांच्याकडे ऑर्डर होती. त्यानुसार जेवणाची तयारी सुरु असताना आरोपी अन्वरने आमरसात असलेला चमचा भाजीच्या पातेल्यात घातला. ही बाब सूरज आणि त्याच्या काकाच्या लक्षात आल्याने दोघेही अन्वरवर चिडले. त्यावरून तिघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. याच दरम्यान चिडलेल्या सुरजने कांदा कापण्याचा चाकू अन्वरच्या दिशेने फेकल्याने त्याच्या नाकावर जखम झाली होती. जेवण वेळेवर व्हावे यासाठी त्यांच्या इतर साथीदारांनी तिघांनाही समजावले. त्यानंतर तिघांनी त्यांचे काम वेळेवर आटोपून रात्री घर गाठले.मात्र अन्वरचा राग कमी झाला नव्हता. बदला घेण्यासाठी तो बुधवारी सुरज राहात असलेल्या सीपी टँक परिसरात गेला. तेथे सूरज दिसताच त्याने आपल्याकडील चाकूने त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याचा मामा आला असता आरोपीने त्याच्याही पोटावर वार केले. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांना रहिवाशांनी त्यांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सूरजचा मृत्यू झाला. त्याचा काका गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी आरोपी अन्वरवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.व्ही.पी. रोड पोलिसांनी या आरोपीकडून चाकू हस्तगत केला असून पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटिव्ही चित्रणही ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये आरोपी वार करत असतानाचे चित्रण आढळले आहे. पोलिसांनी आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने खून
By admin | Updated: May 23, 2014 10:34 IST