महिला डॉक्टर म्हणून त्यांना आरोग्याच्या समस्यांबरोबरच महिलांच्या अनेक समस्या जवळून अनुभवता आल्या. पूर्वी प्रत्येक आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर्स नव्हते. सर्वच आजारांवर प्राथमिक उपचार करावे लागत होते. महिलांच्या सामाजिक आणि मानसिक प्रश्नांचा जवळून अभ्यास करताना त्या स्वावलंबी झाल्या, तर बहुतांश प्रश्न सुटतील, असे डॉ. अंजली यांच्या निदर्शनास आले. वैद्यकीय सेवेबरोबरच स्वावलंबनाचे आदर्श उदाहरण आपण उभे करावे, असे त्यांना वाटत होते. त्याच काळात ‘लोकमत’मधून एलपीजी वितरक पाहिजेत ही जाहिरात वाचली. आणखी एक वेगळी वाट शोधून महिलांना सोईस्कर ठरेल, असा व्यवसाय जाणीवपूर्वक निवडला. ग्रामीण महिलांची अवस्था चूल आणि मूल ही दीर्घकाळापासून सर्वांनीच पाहिली आहे. अगदी मोजक्याच कुटुंबात गॅस उपलब्ध होते. डॉ. अंजली यांनी ग्रामीण भागात घरोघरी गॅस सिलिंडर वितरण करण्याचा मानस ठेवला आणि तशी वाटचाल केली.
डॉ. अंजली यांच्या सासर आणि माहेर या दोन्हीकडे एकत्र कुटुंब पद्धती. त्याचा आपण एक घटक आहोत, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. सासू भागिरथीबाई, सासरे शांतय्या हे वयस्कर असल्याने त्यांना उपचाराची आवश्यकता होती. म्हणूनच, स्वत: डॉ. अंजली व पती डॉ. संजय स्वामी या दोघांनी मूळ कबनसांगवी येथून सासू, सासऱ्याना स्वत:सोबत आणले.
डॉ. अंजली यांचा मुलगा शुभम याला शिक्षणासाठी लातूर येथे ठेवणे आवश्यक होते. एकीकडे सासू, सासऱ्याची सेवा आणि कुटुंब आणि दुसरीकडे मुलाचे शिक्षण, अशा स्थितीत सासूंची भक्कम साथ मिळाली. दिवसभर क्लिनिक, गॅस वितरण आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडून मुक्कामासाठी लातूरला मुलाकडे येणे, ही डॉ. अंजली यांची दिनचर्या ठरली. मुलगा शुभम आता एम.बी.बी.एस. करीत आहे.
सासू, सासऱ्यांनी माझ्यावर आई-वडिलांप्रमाणेच संस्कार केले. हे प्रांजळपणे सांगताना डॉ. अंजली यांना एकत्र कुटुंबाचा अभिमान वाटतो. आज सासू, सासरे हयात नाहीत अन् त्यांनी डॉ. अंजली व त्यांच्या परिवारावर केलेले संस्कार, आशीर्वाद सर्वांना पुढे नेणारे आहेत.
भविष्यातही गरजूंना मदत करणे हा डॉ. अंजली यांचा प्राधान्यक्रम आहे. पती रोटरी क्लबच्या माध्यमातून कार्यरत आहेत. डॉ. अंजली इनरव्हील क्लबमधून सामाजिक कार्यात आहेत. त्या चार्टर प्रेसिडेंट झाल्या होत्या. महिलांच्या सबलीकरणाबरोबरच एकत्र कुटुंब हीच काळाची गरज असल्याचे डॉ. अंजली यांना वाटते.
- डॉ. अंजली स्वामी