इचलकरंजी : भाजप सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी कामगार कायद्यांमध्ये कामगार हिताविरोधी बदल करीत आहे. त्यास देशातील विविध कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर येथील कामगार संघटना कृती समितीच्यावतीने मोर्चा काढून प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी निदर्शने करून सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.निवेदनामध्ये, सरकारने सुरू केलेले बदल कामगारविरोधी असून, यामुळे कामगार संघटना मोडीत निघण्याची शक्यता आहे. यामध्ये तीनशेपेक्षा कमी कामगार असणाऱ्या कारखानदाराला शासनाच्या परवानगीशिवाय कारखाना बंद करण्याचे स्वातंत्र्य, विविध कामगार संघटनांमध्ये कामगार संख्येच्या तीस टक्के सदस्य आवश्यक, दहा कामगारांना लागणारा फॅक्टरी अॅक्ट दुप्पट करून वीस कामगार करण्यात येणार, ५० पर्यंत कंत्राटी कामगार कामावर ठेवण्यास परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच महिला कामगारांसाठी बदल, असे अनेक नवीन नियम या कामगार कायद्यात सूचविण्यात येत आहेत. त्यामुळे याला सर्व कामगार संघटनांनी विरोध दर्शविला असून, सरकारने याबाबत विचार करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.शाहू पुतळ्यापासून मोर्चाची सुरूवात झाली. मुख्य मार्गांवरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. याठिकाणी निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. मोर्चात दत्ता माने, सदा मलाबादे, शामराव कुलकर्णी, आनंदा गुरव, धोंडिबा कुंभार, ए. बी. पाटील, आदींसह अकरा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कामगार कायद्यातील बदलांना विरोध
By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST