राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) तब्बल पाचशे कर्मचार्यांना बढती मिळणार आहे. बॅँकेत बारा वर्षांनंतर बढतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय बॅँकेचे प्रशासकांनी घेतल्याने कर्मचार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शिपाईपासून सरव्यवस्थापकापर्यंत बढती मिळणार असून, बढतीच्या माध्यमातून प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा बॅँकेत २००१-०२ ला कर्मचार्यांच्या बढतीची प्रक्रिया राबविली होती. यावेळी संचालक मंडळ व कर्मचारी संघटना यांच्यातील समन्वयातून कर्मचार्यांच्या सेवा काळ व बढतीचा पॅटर्न ठरवण्यात आला होता. यामध्ये ज्युनिअर क्लार्कचा सेंकड ग्रेडच्या बढतीसाठी दहा वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला होता. सेंकडमधून फर्स्ट ग्रेडसाठी सात, तर फर्स्टमधून मॅनेजरसाठी पाच वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला होता. संचालक मंडळाने १९९० व १९९३ ला नोकरभरती केली होती. त्यानंतर झालेल्या बढतीत या भरतीतील काही कर्मचार्यांना लाभ मिळाला. संचालक मंडळाने २००५-०६ ला १०२ रोजंदारी कर्मचार्यांची भरती केली. या काळात बॅँकेतील राजकीय स्थित्यंतरामुळे कर्मचार्यांची बढती प्रक्रिया रखडली होती. नोव्हेंबर २००९ ला जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक मंडळ आल्याने गेली चार वर्षे ही प्रक्रिया थांबली होती. गेल्या चार वर्षांत अनेक महत्त्वाच्या पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर बढती नसल्याने कर्मचार्यांमध्ये निरुत्साह दिसत आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी कर्मचार्यांच्या बढतीचा निर्णय घेतला. येत्या दोन दिवसांत बढतीचा प्रस्ताव पूर्ण करून मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. साधारणत: जूनअखेर बढतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पाचशे कर्मचार्यांना मिळणार बढती
By admin | Updated: June 1, 2014 01:29 IST