शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणुकीचा दैनंदिन खर्च तहसील कार्यालयाला सादर केला नसल्याची बाब समोर आली आहे. मुदतीत खर्च सादर न करणारे उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र राहू शकतात, याबाबतची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील खर्च पत्राकडे तत्काळ निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी केले आहे.
शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १९६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९९२ जणांनी निवडणूक लढविली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब मुदतीत लेखी स्वरुपात सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च सादर न करणाऱ्या उमेदवाराविरुध्द गुन्हा देखील दाखल करता येतो. शिवाय, त्याला अपात्र ठरविण्याची देखील कार्यवाही होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या तारखेपासून ग्रामपंचायत निवडणुका लढविणाऱ्यांना पाच वर्षासाठी सदस्य म्हणून अथवा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कार्यवाही आहे. त्यामुळे अर्ज माघार घेतलेले, नामनिर्देशन अवैध ठरलेले, विजयी उमेदवार यांनी तत्काळ खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. मोरे यांनी केले आहे.