पणजी : नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द फेसबुकवर शेरेबाजी केल्याबद्दल देऊ चोडणकर याला अटक करण्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत, त्याच्या हेतूबद्दल आम आदमी पक्षाने संशय व्यक्त केला आहे. गुन्हा मार्चमध्ये नोंद झाला असताना निवडणूक प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात १२ मे रोजी समन्स पाठवण्याचे प्रयोजन काय, पहिल्या समन्सला उत्तर देण्यासाठी संशयिताच्या वडिलांनी १५ दिवसांची मुदत मागितली असताना आठवड्याच्या आतच दुसरे समन्स पाठवण्याची घाई का, आदी सवाल पक्षाने केले आहेत. याआधी जातीय हिंसाचार घडवून आणल्याचा किंवा तशी चिथावणी दिल्याचा कोणताही इतिहास संशयिताच्या बाबतीत नाही. कथित शेरेबाजीमुळे अनुचित घटना घडल्याचीही नोंद नाही. उलट संशयिताने माफी मागून फेसबुकवरील संबंधित शेरा काढूनही टाकला, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. चोडणकर याच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराने रालोआच्या कारकिर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती जपले जाईल हे स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी टीका पक्षाने केली आहे. घटनेने सर्वात महत्त्वाचा दिलेला हक्क म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. देऊ चोडणकर याच्या बाबतीत गुन्हा नोंदवून जी कलमे लावली आहेत ती आक्षेपार्ह असल्याचे नमूद करून ज्या पध्दतीने पोलीस हे प्रकरण हाताळत आहेत, त्याबद्दल पक्षाने संशय व्यक्त केला आहे. आर्थिक विकास साधताना सर्वांना सुरक्षा तसेच जनतेचे मूलभूत हक्क जपण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
समन्स पाठविण्याची घाई का?
By admin | Updated: May 27, 2014 01:35 IST