पणजी : गोव्यातून निवडून आलेला खासदार केंद्र सरकारमध्ये मंत्री बनल्यानंतर त्याच्याकडे पर्यटन हे महत्त्वाचे खाते प्रथमच आले आहे. श्रीपाद नाईक हे केंद्रात राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) बनल्यानंतर त्यांच्याकडे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटन, तसेच कला व संस्कृती ही दोन महत्त्वाची खाती सोपविली आहेत. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला श्रीपाद नाईक यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. नाईक यांनी दहा वर्षांपूर्वी त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्यमंत्री या नात्याने कृषी, जहाजोद्योग, नागरी उड्डाण, अर्थ, अशी खाती सांभाळली होती. त्यांना आता प्रथमच स्वतंत्र ताबा देऊन राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच प्रथमच पर्यटन, कला व संस्कृती ही खाती सोपविण्यात आली आहेत. या खात्यांबाबत नाईक यांनी समाधान व्यक्त केले व आपल्याकडील पर्यटन खाते गोव्यास अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला. नाईक यांनी सकाळीच पदभार स्वीकारला व काम सुरू केले. उत्तर गोव्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेला खासदार केंद्रात राज्यमंत्री बनल्याने आणि त्यांच्याकडे पर्यटनासारखे महत्त्वाचे खाते आल्याने गोमंतकीयांतही आनंद व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते खुश झाले आहेत. गोवा मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. राज्याच्या किनारी भागात पर्यटन व्यवसायास पोषक अशा पुरेशा साधनसुविधा नाहीत व याचा त्रास पर्यटकांना होतो. गोव्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टूर अॅण्ड ट्रॅव्हल व्यावसायिकही गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात साधनसुविधा वाढाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. (खास प्रतिनिधी)
श्रीपाद यांच्या रूपाने गोव्याला पर्यटन खाते
By admin | Updated: May 28, 2014 01:57 IST