हरमल : येथील हरमल समुद्रकिनारा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटकांचा येथे राबता असतो. जसे पर्यटकांसाठी कायदे अस्तित्वात आहेत, तसेच कायदे किनारे संरक्षणासाठीही आहेत; परंतु कायद्याच्या अंमलबजावणीमुळे किनार्यांचे सौंदर्य लुप्त होत आहे. एकंदर संबंधित खात्याचा कारभार ‘आंधळे दळते अन् कुत्रे पिठ खाते,’ असाच चालत असतो, असा समज बनला आहे. त्यामुळे बकालवस्थेकडे झुकण्यापूर्वी हरमल किनार्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी आणि सुशोभिकरणासाठी पर्यटन व वन खात्याने संयुक्तरीत्या पावले उचलावीत, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. याबाबत येथील नागरिक अभिषेक नाईक म्हणाले की, साधारण हरमलला दीड-दोन किलोमीटरची किनारपट्टी आहे. काही भाग सोडल्यास किनार्याला हिरवाईचा साज आहे. सुरूची झाडे, मारवेल, लिंगड व काटेरी झुडपांमुळे किनार्याचे सौंदर्य खुलून दिसते. पावसाळ्यात हा परिसर नजरेस सुखावतो. सर्वत्र हिरवाई व किनार्याची धूप रोखण्यासाठी पसरलेला मारवेल आढळतो. या विस्तीर्ण किनार्यावर ताठ मानेने व ४०-५० वर्षांपासून उभी असलेली सुरूची झाडे पावसाळ्यात कोसळत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अशीच सुरूची झाडे जमीनदोस्त झाली होती. त्या वेळेस वन खात्याच्या अधिकार्यांनी येऊन पाहणी केली. मात्र, नेहमीप्रमाणे वन खात्याने या किनार्याकडे दुर्लक्ष केले. येथे वृक्षारोपण व अन्य योजना राबविण्याकडे वन खात्याबरोबरच पर्यटन खात्यानेही लक्ष दिले नाही. दरवर्षी पर्यटन हंगामात ९ ते १० शॅक्स या किनार्यावर पर्यटन खात्याच्या निर्देशानुसार उभारले जातात. त्या शॅक्सचे वाटप करण्यासाठी पर्यटन खाते व अधिकारी येथे येतात आणि काम झाले की निघून जातात. त्यानंतर शॅक्स उभारणीत सगळा सावळागोंधळच असतो. जर पर्यटन खात्याने शॅक्स वाल्यांना सीमा निश्चित केल्यास पादचार्यांना मोकळेपणाने फिरता येणे शक्य असल्याचे मत नागरिक संगम सातोस्करने व्यक्त केले. विशेष म्हणजे काही लोकांनी किनार्यावर नारळाची झाडे व भेंडीची झाडे लावून सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)
हरमल समुद्रकिनार्याला वाचवा
By admin | Updated: May 11, 2014 01:00 IST