जयशंकर गुप्ता -नवी दिल्ली : वाराणसीतील घाटांची सफाई आणि सौंदर्यीकरणासाठी १८ कोटी मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केली. नाईक यांनी पर्यटन व संस्कृती खात्याचा स्वतंत्र ताबा स्वीकारल्यानंतर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान वाराणसीतील घाटांच्या दुर्दशेचा उल्लेख करून त्यांच्या दुरुस्तीची व सौंदर्यीकरणाची गरज असल्याचे म्हटले होते. कॅसिनोंना प्रोत्साहन देण्यास आपण अनुकूल नसल्याचे श्रीपाद नाईक यांनी या वेळी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. गंगेचे पावित्र्य आणि सफाई टिकविण्याबरोबरच किनार्यावरील शहरे देशी व परदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रे बनविण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. देशातील पर्यटकांची संख्या वाढविणे तसेच देशी-परदेशी पर्यटकांना सुरक्षित, सुविधायुक्त अशी पर्यटनस्थळे असण्यावर यापुढे भर दिला जाईल, असे नाईक यांनी सांगितले. देशातील अनेक राज्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशी काही स्थळे आहेत. अधिकारी व संबंधित तज्ज्ञांच्या साहाय्याने ही राज्ये पर्यटनविषयक योजना तयार करतील. राज्यांत तसेच केंद्रीय पातळीवर पर्यटन गाइड्सना प्रशिक्षण देण्यासाठी खास संस्था स्थापन करण्याचा विचार आहे. भारतीय संस्कृतीची परदेशात ओळख करून देण्यासाठी तेथे रोड शो आयोजित करण्यात येतील, असे ते म्हणाले. पर्यटनमंत्री या नात्याने आपण गोव्याप्रमाणेच अन्य राज्यांत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोंना प्रोत्साहन देणार आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, वैयक्तिकरीत्या आपण कॅसिनोंना परवाने देण्याच्या विरोधात आहे; पण हा विषय राज्यांचा आहे. कॅसिनोरूपी जुगारामुळे कोणाचे भले झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करून नाईक म्हणाले, हा व्यवसाय हळूहळू बंद व्हायला हवा. गोव्यात कॅसिनो असले, तरी तेथे गोवेकरांना प्रवेश दिला जात नाही, असे त्यांनी सांगितले.
कॅसिनोंना प्रोत्साहन नकोच : श्रीपाद नाईक
By admin | Updated: May 28, 2014 01:57 IST