पणजी : येथील बंदर कप्तान जेटीजवळ धरणे धरून बसलेल्या ३६१ संपकरी जीवरक्षकांना पोलिसांनी अटक करून आझाद मैदानावर आणल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र, सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. ‘एस्मा’ झुगारून आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार जीवरक्षकांनी केला आहे. दुपारी ११.३0 वाजण्याच्या सुमारास मामलेदार, पोलीस उपाधीक्षक सेराफिन डायस व निरीक्षक सिद्धांत शिरोडकर पोलीस फौजफाटा घेऊन जेटीजवळ आले आणि आंदोलकांना तेथून जाण्यास सांगितले; परंतु कोणीही न ऐकल्याने अखेर अटक करण्यात आली. या सर्वांना चालतच आझाद मैदानावर आणण्यात आले. तेथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवून नंतर त्यांना उपविभागीय न्यायदंडा-धिकाऱ्यांसमोर हजर करून सोडण्यात आले. आंदोलकांचे नेतृत्व करणारे आयटकचे सचिव सुहास नाईक यांनी या घटनेचा निषेध करताना सरकारची बुद्धी भ्रष्ट झाल्याचा आरोप केला. जीवरक्षकांच्या मागण्यांबाबत वर्षभरापूर्वी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आणि मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्या सहीने झालेला करार झाला होता तो पाळा, असे आवाहन केले. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मज्जाव असताना हा आदेश धुडकावण्यात आला. त्यामुळे भादंसंच्या कलम १५१ खाली या सर्वांना अटक करण्यात आली व सायंकाळी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या आंदोलनाला सरकारी कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेचे गजानन नाईक, वीज कर्मचारी संघटनेचे राजू मंगेशकर, सरकारी कर्मचारी संघाचे गणेश चोडणकर, सातुर्मिनो मिस्किता यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिल्याचे नाईक यांनी सांगितले. सेवेत कायम करणे, महिना २१ हजार रुपये पगार तसेच ज्या १७ जीवरक्षकांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे, त्यांना पुन्हा सेवेत घेणे आदी मागण्या आहेत. सरकार व कंपनीने हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संप चालूच राहील, असे ‘आयटक’चे प्रदेश सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
३६१ जीवरक्षकांना अटक, सुटका
By admin | Updated: December 31, 2015 02:24 IST