कुरखेडा : सर्व सामान्य जनतेचा विकास हेच भाजपाचे ध्येय धोरण आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने कुरखेडा नगरातील मतदारांनी नगर पंचायतीवर एकहाती सत्ता दिल्यास पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणून कुरखेडा नगराचा चेहरामोहरा बदलविणार असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. बुधवारी कुरखेडा येथे आयोजित निवडणूक प्रचार जाहीर सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर आ. क्रिष्णा गजबे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शालू दंडवते, भाजपाचे निवडणूक निरीक्षक मोतीलाल कुकरेजा, नानाभाऊ नाकाडे, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, आरमोरी तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, सदानंद कुथे, गोवर्धन चव्हाण, माधवदास निरंकारी, सुहांगणा प्रधान आदी उपस्थित होते. पालकमंत्री आत्राम म्हणाले, विकासाचे दुसरे नाव भाजप असून भाजप सरकारच सर्वसामान्य नागरिकांचा विकास करू शकते, यामुळे मतदारांनी कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराच्या पाठिशी खंभीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी आ. क्रिष्णा गजबे, किसन नागदेवे, शालू दंडवते यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी भाजप उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या, असे आवाहन केले. यावेळी विलास गावंडे यांनी प्रस्ताविकेतून कुरखेडा नगर विकासाचा आराखडा नागरिकांसमोर मांडला. संचालन राम लांजेवार यांनी केले तर आभार पं. स. सदस्य चांगदेव फाये यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)५० शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश४निवडणूक प्रचार सभेत कुरखेडा तालुक्यातील ५० शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आत्राम यांच्या हस्ते त्यांचे पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. भाजपचा निवडणूक वचननामा यावेळी जाहीर करण्यात आला.
कुरखेडाचा चेहरामोहरा बदलविणार
By admin | Updated: November 5, 2015 01:56 IST