गडचिरोली : माओवाद्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याचा निषेध करीत २६ जानेवारी गणतंत्रदिनी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. त्याच्या चार दिवसांपूर्वीच इशारा म्हणून त्यांनी जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात असलेल्या येडमपायली जंगलात खासगी कंत्राटदाराच्या वाहनांची जाळपोळ गुरूवारी केली. वर्षभरामध्ये जाळपोळीची ही दुसरी घटना आहे. वाहने जाळल्यामुळे येडमपायली-जळेगाव रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे.गडचिरोलीपासून ५० किलोमीटरवर आणि धानोरापासून ६० किलोमीटरवर असलेल्या येडमपायली या गावापासून १४ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत आहे. येडमपायली ते जळेगावपर्यंत जाण्याकरिता आधी छोटा आणि कच्चा रस्ता होता. गेल्या वर्षी या रस्त्याचा समावेश डीपीसीच्या आराखड्यात करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याकरिता तरतूद करण्यात आली. निविदा प्रक्रियेमध्ये हैदराबाद येथील सरला कंस्ट्रक्शनला या रस्त्याचे कंत्राट मिळाले. १७ कोटी रूपये खर्च करून हा १४ किमीचा दीड पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. रस्त्याचे खोदकाम करून महिनाभरात खडीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. या कामावर ३० मजूर कार्यरत होते. व्हायब्रेटरी रोलरने खडीकरणाची दबाईचे काम सुरू असताना गुरूवारी सायंकाळी ४ ते ५ वाजतादरम्यान १५ ते २० माओवादी अचानक येडमपायली येथे पोहोचले. माओवाद्यांनी मजुरांना काम थांबविण्याचे फर्मान सोडून बाजुला होण्यास सांगितले. त्यानंतर सरला कंस्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली. त्यामुळे या अधिकारी व मजुरांनी रस्त्याचे काम तातडीने थांबविले. वाहने रस्त्याच्या बाजुला केली. त्यानंतर माओवाद्यांनी परिसरातून लाकडे जमा करून वाहनाखाली पेटविली. लाकडे पेटताच वाहनेदेखील जळायला लागली. रस्त्याच्या कामावर असलेल्या मजुरांनी येडमपायली गावाच्याजवळ दोन झोपड्या उभारल्या आहेत. तेथे चालक व इतर मजूर निवासी राहत होते. माओवाद्यांनी वाहने जाळल्यानंतर मजुरांचा थरकाप उडाला. जाळपोळीनंतर माओवाद्यांनी घोषणा देत घटनास्थळावरून काढता पाय घेतला. हैदराबाद येथील सरला कंस्ट्रक्शन कंपनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रस्त्याची कामे घेत असते. गेल्या वर्षी या घटनेच्या १४ जानेवारी २०१३ रोजी धानोरा तालुक्यातील गोडलवाही येथे माओवाद्यांनी जाळपोळ केली होती. २१ एप्रिल २०१४ रोजी अहेरी तालुक्यातील दोडगिर मार्गावर जिमलगट्टा भागात पाच ट्रक-ट्रेलर जाळले होते. ही वाहनेदेखील सरला कंस्ट्रक्शन कंपनीची असल्याचे सांगण्यात येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रत्युत्तराचा प्रयत्नगेल्या दोन वर्षात सीआरपीएफ व सी-६० च्या पोलिसांनी माओवाद्यांविरोधात आघाडी उघडली आहे. त्यामध्ये माओवाद्यांचे मोठ्या प्रमाणावर एनकाऊंटर करण्यात आले. तसेच आत्मसमर्पण योजनेत मोठ्या प्रमाणात माओवाद्यांच्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे माओवादी चळवळीची पाळेमुळे उखडली जात असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर गुरूवारी माओवाद्यांनी केलेली जाळपोळ पोलिसांच्या अभियानाला प्रत्युत्तर देण्याचा प्रकार असल्याचे सांगितले जाते.सर्वात आधी पत्रकार पोहोचलेही घटना दुर्गम भागात असल्याने रात्री उशिरापर्यंत जाळपोळीची माहिती गडचिरोलीत पोहोचली. मात्र त्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजतादरम्यान पत्रकार येडमपायली गावात पोहोचले. तेथे त्यांना वाहने जळत असल्याचे दिसून आले. घटनेबाबत माहिती सांगण्यास कोणी फारसे उत्सुक नव्हते.
वर्षभरात दुसरी जाळपोळ
By admin | Updated: January 24, 2015 01:00 IST