"प्रगती अशी असणार असेल तर…", मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेवर मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:30 IST2026-02-16T10:25:58+5:302026-02-16T10:30:33+5:30
"माणसांचे जीव धोक्यात घालून...", मुलुंड दुर्घटनेवर मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली-"नागरिकांची सुरक्षा..."

"प्रगती अशी असणार असेल तर…", मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेवर मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Ruchira Jadhav Post On Mulund Accident: मुंबईतीलमुलुंड पश्चिम परिसरात शनिवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली. लाल बहादूर शास्त्री मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक कोसळला आणि तो खालून जात असलेल्या रिक्षासह इतर काही वाहनांवर कोसळला.या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा राडारोडा थेट चालत्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, यामध्ये ३ ते ४ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेवर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीने मुलुंडमध्ये घडलेल्या या घटनेसंदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंडमधील या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. अशातच मराठी अभिनेत्रीने रुचिरा जाधवने या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रुचिराने ही पोस्ट शेअर करुन त्यामध्ये लिहिलंय, "मुलुंडची एक रहिवासी म्हणूल काल-परवाच घडलेल्या त्या घटनेमुळे मी पूर्णपणे हादरुन गेले आहे. मी रोजच त्या रोडवरून प्रवास करते. माझ्यासारख्या बऱ्याच लोकांसाठी हा रस्ता रोडच्या प्रवासाचा एक भाग आहे."
यापुढे तिने लिहिलंय, "ही घटना नागरिकांची सुरक्षा,त्यांची जबाबदारी आणि प्रशासन व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित आहे. एक नागरिक म्हणून या प्रकरणातील जबाबदार लोकांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. पायाभूत सुविधा या माणसांचे जीव धोक्यात घालून करता येऊ शकत नाहीत.आम्ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतो. या बदल्यात आम्हाला चांगले आणि सुरक्षित रस्ते तसेच जबाबदार प्रशासनाची अपेक्षा आहे. प्रगती अशी असणार असेल तर थांबवा. आम्ही याचसाठी टॅक्स भरतो का?" , अशी पोस्ट लिहून तिला प्रशासनाला जाब देखील विचारला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर रुचिरा जाधवची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे." रुचिता अशा प्रकारच्या विषयावर पुढे येऊन बोलयालाही हिंमत लागते आणि तू ते केलंस."," तू बोललीस ते खरं आहे". अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर केल्या आहेत.