"तो निर्णय चुकला, पण...", घटस्फोटाबद्दल शर्मिष्ठा राऊतचं वक्तव्य, म्हणाली-"जगात प्रत्येकाचा स्वभाव..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:09 IST2025-07-23T11:07:05+5:302025-07-23T11:09:11+5:30
घटस्फोटावर शर्मिष्ठा राऊतचं भाष्य, नेमकं काय म्हणाली?

"तो निर्णय चुकला, पण...", घटस्फोटाबद्दल शर्मिष्ठा राऊतचं वक्तव्य, म्हणाली-"जगात प्रत्येकाचा स्वभाव..."
Sharmishtha Raut : 'जुळून येती रेशीमगाठी', 'उंच माझा झोका' यांसारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. 'मन उधाण वाऱ्याचे‘मधील साकारलेली नीरजा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. एक गुणी अभिनेत्री असण्यासोबतच शर्मिष्ठा उत्तम निर्माती देखील आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
'लोकशाही मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. शर्मिष्ठाचं पहिलं लग्न अमेय निपाणकरशी झालं होतं. परंतु, २०१८ मध्ये त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान अभिनेत्री घटस्फोटाबद्दल म्हणाली. "त्या काळात आपलं आयुष्य आपल्याला बरंच काही शिकवून जातं. 'बिग बॉस'मध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा सुद्धा मी हेच बोलले होते की, मी लग्नाचा निर्णय घेतला होता. तो माझा निर्णय होता आणि तो चुकला. यासाठी मी इतर कोणालाही दोष देणार नाही, आपल्याही काही चुका होतात."
त्यानंतर शर्मिष्ठा म्हणाली, "जेव्हा न पटण्याची किंवा मतभेदाची सुरुवात होते तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचीच दिसत असते. या जगात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे मी इतकंच म्हणेन निर्णय माझा चुकला. माझे काही निर्णय चुकले तसे समोरच्या व्यक्तीचेही चुकले. दोन चांगली माणसं एकत्र आली म्हणजे सगळं चांगलंच होईल असं नसतं."
आई-वडील पाठीशी ठामपणे उभे राहिले...
"त्या काळात माझे कुटुंबीय माझ्यासोबत ठामपणे होते. मी हे ऑनकॅमेरा सगळ्यांना सांगू इच्छिते आजकाल वैष्णवी हगवणे अशी प्रकरणं समोर येत आहे. अशा बऱ्याच मुलींना घरी परत यायचं आहे. त्यांना परत येऊद्या समाजाचा विचार करु नका. त्यावेळी माझ्या घरच्यांचं एकच म्हणणं होतं की, 'राणी तू काहीच टेन्शन घेऊन नको, तुझा निर्णय ठरलाय ना मग आम्ही तुझ्या पाठिशी आहोत'. अशा पद्धतीने त्यांनी मला साथ दिली."
नात्यात जीव उरला नाहीतर...
"आपल्याकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की घटस्फोट म्हटलं की सासूने सूनेला जाळलं किंवा घरात मारहाण झाली एवढ्याच गोष्टींचा विचार केला जातो. पण, तात्विक मतभेद देखील असू शकतात. माझं म्हणणं हेच आहे नातं जेव्हा संपतं, त्याच्यात काही जीवच उरत नाही. तर त्याला काहीच फरक पडत नाही." असं म्हणत शर्मिष्ठाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.