"खूप त्रास…", मढ आयलँड येथील रस्त्याची अवस्था पाहून जुई गडकरी भडकली, व्हिडीओ शेअर करत दाखवली परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:51 IST2026-02-10T08:49:21+5:302026-02-10T08:51:21+5:30
१० किलोमीटरचा रस्ता करायला ३.५ वर्ष लागतात? मढ आयलँड रस्त्याची दयनीय अवस्था जुई गडकरीचा सवाल, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप

"खूप त्रास…", मढ आयलँड येथील रस्त्याची अवस्था पाहून जुई गडकरी भडकली, व्हिडीओ शेअर करत दाखवली परिस्थिती
Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी हा मराठी मालिकाविश्वातील आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते. अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारत जुईने आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयासोबतच ती विविध विषयांवर आपली रोखठोक मते मांडतानाही दिसते.आपल्या मालिकेमुळे कायम चर्चेत असणारी जुई सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या जुईचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये तिने मुंबईमधील मढ आयलँड येथील रस्ते आणि ट्रॅफिकचा अनुभव सांगत संताप व्यक्त केला आहे.
जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या माध्यमातून गेली अनेक प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. यासाठी अभिनेत्रीला रोज प्रवास करून शूटिंगच्या सेटवर म्हणजेच मढ आयलँड येथे जावं लागतं. मात्र, रस्त्याची कामे आणि खड्डे असल्याने कायम याचा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागतो आहे.असं जुई या व्हिडीओमध्ये सांगत आहे. दरम्यान, आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर या संदर्भात एक व्हिडीओ शेअर करत जुईने म्हटलंय, "आज न राहवून हे रील पोस्ट करतेय. गेली ३.५ वर्ष मी मढ आयलँड नावाच्या एका अत्यंत वाईट एरियामध्ये शूट करतेय...हो वाईट...कारण, इथे कुठल्याच सुविधा नाहीत...अगदी बेसिक ही नाही...तसं तर हा डिफेन्सचा एरिया आहे. तरीही इतका दुर्लक्षित? गेली ३.५ वर्ष इथे रस्त्याचं काम सुरू आहे...टप्प्या टप्प्यात सुरूच आहे.आरामात सुरू आहे. रोज नवीन खड्डे, रोज नवीन त्रास,यात शनिवार रविवार इथे जत्रा लागते.अक्सा बीचला. ती अक्षरशः ट्राफिकच्या बाबतीत जीवघेणी असते. जर रात्री ही इथे एवढं ट्राफिक लागत असेल तर नक्की काय करावं माणसाने? इथे एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करायचं?
१० किलोमीटरचा रस्ता करायला ३.५ वर्ष लागतात?
यापुढे जुईने लिहिलंय," आधीच मुंबईतल्या ठाण्यातलं ट्राफिक कधीही न कमी होणारं आहे. अगदी सगळ्याच मोठ्या सिग्नलला काही ना काही खणलेलं आहेच. हे सगळं पार करून मढला यायचं आणि ट्राफिकमध्ये अडकायचं. हा रोजचा दिनक्रम झालाय आणि आज अगदीच राहवलं नाही म्हणून हे पोस्ट करतेय.माझ्या आधीही बऱ्याच अभिनेत्यांनी अशा स्टोरीज, रील्स केल्यात.पण उपयोग शून्य.पावसाळा आला तर अजून वाईट असतं इथलं. मला एक कळत नाहीये १० किलोमीटरचा रस्ता करायला ३.५ वर्ष लागतात? कशाचीच उत्तरं मिळत नाहीयेत ना काही सुधारणा दिसतेय.खूप त्रास देणारा प्रवास झालाय हा.मढ मधून बाहेर पडायला कधी कधी २ तास लागतात आणि त्या पुढे सुरू होतो घरी जायचा प्रवास..आम्ही खरंच यासाठी पात्र आहोत? टॅक्स वेळेत भरा, सगळ्या गोष्टी नीट पाळा, कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करूनही जर अशी 'सुविधा' मिळत असेल तर नक्की करायचं काय सामान्य माणसाने?' असं म्हणत जुईने प्रशासनाच्या कारभारावर सवाल उपस्थित केला आहे.
"मला माहितीये यावर मला अनेक लोक ट्रोल करतील.पण, एकदा येऊन बघा इथे आणि मग कळेल किती वाईट झालीये परिस्थिती. त्यात एवढ्याशा रस्त्यावरून मोठे ट्रक्स, बसेस ही वाहनं देखील ये-जा करतात. ट्राफिक जाम होणारच आहे. यावर कधी उपाय मिळेल माहित नाही. रस्त्याच्या कामाचं वेग कधी वाढेल माहित नाही."असं म्हणत जुईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि श्रीकांत शिंदे यांना टॅग करत लवकरात लवकर या परिस्थितीवर मार्ग काढावा, अशी विनंती देखील केली आहे.