अशोक मा.मा मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! म्हणाला-"हा प्रवास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:28 IST2025-06-12T14:25:34+5:302025-06-12T14:28:10+5:30
अशोक मा.मा मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! शेअर केली भावुक पोस्ट

अशोक मा.मा मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! म्हणाला-"हा प्रवास..."
Indraneil Kamat : कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा.मा ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या मालिकेचं कथानक, नवनवीन ट्विस्ट खिळवून ठेवतात. सध्या ही मालिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत अशोक सराफ यांनी मालिकेत एका कडक शिस्तीच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रसिका वाखारकर देखील यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसते आहे. दरम्यान, अलिकडेच 'अशोक मा.मा' मालिकेमध्ये 'पिरतीचा वणवा उरी पेटला' फेम अभिनेता इंद्रनील कामतने एन्ट्री घेतली. आता या अभिनेत्याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.
'अशोक मा.मा' मालिकेत भैरवीचा जुना मित्र अर्जुन बेलवलकर तिचा बॉस म्हणून इंद्रनील कामतने खास कॅमिओ केला. त्यानंतर आता तो साकारत असलेला अर्जुन नावाचं पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर इंद्रनीलने खास पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "हा १२ दिवसांचा प्रवास खूप छान होता. अशोक मा.मा मालिकेतील अर्जुनच्या भूमिकेतील माझा कॅमिओ संपला आहे आणि तुमच्या प्रेमामुळे तो आणखी खास झाला आहे. मला तुमच्याकडून मिळालेली प्रेम, कौतुकाची थाप आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद, यासाठी मी तुमचा आभारी राहीन. तसंच या सुंदर संधीसाठी कलर्स मराठीचे मनापासून आभार."
पुढे त्याने लिहिलंय, "सुरुवातीपासूनच तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुमचा पाठिंबा कायम मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. तुमच्या आशीर्वादाने मी लवकरच एक नवीन कथा आणि एका नवीन भूमिकेतून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईन." अशी भावुक पोस्ट लिहून अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वर्कफ्रंट
इंद्रनील कामतने 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेत साकारलेली भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्याच्या कामाचं सगळ्यांनीच कौतुक केलं होतं. अलिकडेच तो केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' चित्रपटात झळकला. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होती.