आईचा अखेरचा फोन उचलला नाही, ४५ दिवसांनी वडिलांचाही मृत्यू; कॉमेडियनच्या डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:31 IST2025-09-15T12:30:41+5:302025-09-15T12:31:22+5:30
विमानतळावर लोक सेल्फी काढायला आले..., कीकू शारदाला अश्रू अनावर

आईचा अखेरचा फोन उचलला नाही, ४५ दिवसांनी वडिलांचाही मृत्यू; कॉमेडियनच्या डोळ्यात पाणी
'राइज अँड फॉल' या नव्या रिएलिटी शोमध्ये कॉमेडियन कीकू शारदाही(Kiku Sharda) सहभागी झाला आहे. इतके दिवस कीकूला आपण 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये बघत होतो. आता तो 'राइज अँड फॉल'मध्ये इतर सदस्यांसोबत स्पर्धा करताना दिसणार आहे. शोमध्ये धनश्री वर्मा, अर्जुन बिजलानी हे देखील आहे. तर कुस्तीपटू संगीता फोगाटही शोमध्ये होती. मात्र सासऱ्यांचं निधन झाल्याने ती शोमधून बाहेर पडली. या बातमीमुळे सगळेच भावुक झाले होते. कीकू शारदाही संगिताची परिस्थिती समजू शकतो म्हणाला आणि त्याने त्याच्या आईचं निधन झालं तेव्हाची आठवण सांगितली.
शोमध्ये कुब्रा सैत म्हणाली, "तुम्ही दूर असताना जेव्हा आपल्या माणसाचं निधन होतं ही खरंच खूप दु:खद गोष्ट आहे'. यावर कीकू शारदा म्हणाला, "दोन वर्षांपूर्वी मी अमेरिकेत होतो आणि माझ्या आईचं निधन झालं. मी लगेच विमानतळावर पोहोचलो. या दु:खातून सावरणं अजिबातच सोपं नाही. तुम्ही एक अभिनेता असल्याने लोक तुमच्याजवळ फोटो काढण्यासाठी येतात. तेव्हा तुम्हाला तुमचं दु:ख नीट सांगताही येत नाही."
कीकू शारदाला रडू कोसळलं. तो पुढे म्हणाला, "मी आईच्या शेवटचा फोनही उचलू शकलो नव्हतो. उद्या फोन करेन असं मनात म्हटलं कारण मी थोडा कामात होतो. पण दुसऱ्या दिवशी तीच नव्हती. या दु:खातून वडील सावरु शकले नाहीत आणि ४५ दिवसांनी त्यांचंही निधन झालं. एका ठराविक वयानंतर तुम्हाला जोडीदाराची आवश्यकता असते. मला प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल माहित नाही पण आपल्या माणसांजवळ कायम राहा. त्यांना वेळ द्या, फोन करत राहा."