IranvsIsrael: पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना हिना खानचं प्रत्युत्तर; म्हणाली, 'जे लोक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:38 IST2026-03-03T13:36:16+5:302026-03-03T13:38:09+5:30
हिना खानने शेअर केली खरमरीत पोस्ट, पण काही नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

IranvsIsrael: पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना हिना खानचं प्रत्युत्तर; म्हणाली, 'जे लोक..."
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचे सावट आता भारतीय राजकारणावरही दिसू लागले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. मात्र, या वादात आता अभिनेत्री हिना खानने उडी घेत विरोधकांना कडक शब्दांत सुनावले आहे.
हिना खानची पोस्ट चर्चेत
हिना खान सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपली मते मांडताना दिसते. तिने नुकतीच 'X' (ट्विटर) हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हिनाने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत एक लहान मुलगा टायर चालवताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "जे हे (टायर) सुद्धा नीट चालवू शकत नाहीत, ते त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत जे एवढा मोठा देश चालवत आहेत. दुस्साहस, हिंमत आणि विडंबना! जय हिंद."

विरोधकांवर साधला निशाणा
हिनाने आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी, तिचा रोख स्पष्टपणे मोदी सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांकडे होता. हिनाने हीच पोस्ट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केली आहे. खामेनेईंच्या निधनावर केंद्र सरकारने अधिकृत शोक व्यक्त न केल्याने सोशल मीडियावर एका वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात होती, त्याला हिनाने हे उत्तर दिले आहे.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हिना खानच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तिला 'काम मिळवण्यासाठीची धडपड' असे म्हटले आहे, तर काहींनी 'स्वतःच्या धर्माशी एकनिष्ठ नाहीस' अशी टीका केली आहे. एका युजरने उपरोधिकपणे विचारले की, 'जर मी टायर चालवण्यात चॅम्पियन असेन, तर मी देश चालवू शकतो का?'
दुसरीकडे खामेनेईंच्या मृत्यूवर 'बिग बॉस १९' फेम फरहाना भटने प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं होतं. यावर हिना खानचा पती रॉकी जैस्वाल चांगलाच भडकला. त्याने नाव न घेता अशा लोकांवर टीका केली जे खामेनेईंच्या मृत्यूवर भारतात अश्रू ढाळत आहेत. हेच लोक भारतीय सैनिक, पोलिसांसाठी कधी रडले का? महान एपीजे अब्दुल कलामांसाठी तरी रडले का? असे त्याने खडसावून विचारले. तसंच जो देश सुरक्षा देतोय त्याच्याच पाठीत खंजीर खुपसत आहात अशीही त्याने टीका केली.