"३ वर्ष मी तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा...", अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:29 IST2026-01-28T12:26:31+5:302026-01-28T12:29:56+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सेलिब्रिटी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.

"३ वर्ष मी तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा...", अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अनेक सेलिब्रिटींशीही चांगले संबंध होते. त्यांच्या निधनानंतर मराठी सेलिब्रिटी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
अभिनेत्री गार्गी फुले यांनी अजित पवारांचा फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. "अजितदादा तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌸अजूनही विश्वास बसत नाहीये.... ३ वर्ष तुमच्याबरोबर पक्षाचं काम केलं... या निमित्ताने तुम्हाला जवळून पाहता आलं.... तुमच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही", असं म्हणत गार्गी फुले यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.