धक्कादायक! 'कांतारा'च्या सेटवर पुन्हा भयानक घटना, थोडक्यात वाचला ऋषभ शेट्टी, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:41 IST2025-06-16T11:40:13+5:302025-06-16T11:41:14+5:30
ऋषभ शेट्टीच्या आगामी 'कांतारा चाप्टर १'च्या सेटवर मोठी दुर्घटना घडली असून यात प्रमुख कलाकारांसह इतरांचा जीव थोडक्यात वाचला आहे. काय घडलं नेमकं?

धक्कादायक! 'कांतारा'च्या सेटवर पुन्हा भयानक घटना, थोडक्यात वाचला ऋषभ शेट्टी, काय घडलं?
'कांतारा चाप्टर १' चित्रपटामागची (kantara chapter 1) विघ्नं संपायचं काही चिन्ह दिसत नाहीत. दर १५-२० दिवसागणिक या सिनेमाच्या सेटवर दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. अशातच 'कांतारा चाप्टर १'च्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. कर्नाटकमधील शिवमोग्गा जिल्ह्यातील मॅनी जलाशयावर ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका भयानक घटनेने सर्वांना हादरवून सोडले. दिग्दर्शक-अभिनेते ऋषभ शेट्टीसह त्यांच्या ३० कर्मचाऱ्यांची बोट पलटी झाली. बोट पलटी झाल्याने अचानक सगळे पाण्याखाली गेले. काय घडलं नेमकं?
'कांतारा चाप्टर १'च्या सेटवर पुन्हा दुर्घटना
हा अपघात शिवमोग्गातील मॅनी जलाशयात मेलिना कोप्पा या ठिकाणी घडला. बोट पलटी होऊन फक्त काही इंच खोल पाण्यात पडल्याने सर्व जण सहज सुखरुप किनारी पोहोचू शकले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही गंभीर जखम झाली नाही. ऋषभ शेट्टी आणि त्याचे ३० कर्मचारी या अपघातात थोडक्यात वाचले. परंतु यामध्ये शूटिंग उपकरणं, कॅमेरे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले. याशिवाय काही वस्तू पाण्यात हरवल्या. तिर्थाळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.
'कांतारा चाप्टर १'च्या आधीच्या दुर्घटना
मागील काही महिन्यातच चित्रपटाच्या सेटवर तीन कलाकारांना वेगळ्या दुर्घटनांमध्ये जीव गमवावा लागला होता. त्या घटनांपैकी MF कपिलचा आणि राकेश पुजारी यांचा सुर्यपर्णिका नदीत बुडून मृत्यू झाला. त्यामुळे 'कांतारा चाप्टर १'च्या सेटवरील दुर्घटना संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. असं जरी असलं तरी या सिनेमाचा निर्माता-दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता ऋषभ शेट्टी शो मस्ट गो ऑन म्हणत, शूटिंग सुरुच ठेवत आहे. याच वर्षी अर्थात २ ऑक्टोबर २०२५ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.