लंडनला जायला बॅग भरली अन् मला सिनेमातून काढलं, कारण... गायत्री दातारने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:05 IST2025-09-28T13:58:23+5:302025-09-28T14:05:51+5:30

'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार सिनेमात का दिसत नाही?

'तुला पाहते रे' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार. गायत्री मुळची पुण्याची आहे. अनेक संघर्ष करुन, ऑडिशन्स देऊन तिला पहिली मालिका मिळाली होती. सुबोभ भावेच्या अपोझिट झळकल्याने तिला कमालीची लोकप्रियता मिळाली.

नुकतीच ती 'चल भावा सिटीत' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. 'अबीर गुलाल' मालिकेत तिने नकारात्मक भूमिकाही साकारली.

गायत्री इतकी वर्ष इंडस्ट्रीत आहे पण ती कधीच मराठी सिनेमांमध्ये दिसली नाही. असं का? हा प्रश्न विचारला असता तिने आलेला अनुभव सांगितला.

'मुक्कामपोस्ट मनोरंजन' पॉडकास्टमध्ये गायत्री दातार म्हणाली, "सिनेमापासून लांब का आहे? हा प्रश्न मलाही पडला आहे. तोंडापर्यंत घास येतो पण तसाच जातो. एक सिनेमा होता ज्याचं शूट लंडनला होणार होतं. कोरोनाच्या आधीची ही गोष्ट आहे."

"मी फिल्म साईन केली, रिहर्सल झाली, पोस्टर फोटोशूट झालं, मला पैसेही आले. लंडनचं तिकीट आलं, व्हिसा झाला सगळं सेट होतं. मला काही वेळात लंडनला जायला घरुन निघायचं होतं. मी बॅग भरलेली होती. सगळ्या मित्र परिवाराने मला बाय बाय केलं."

"पण अचानक मला मेसेज आला की थांब, तिकडे लॉकडाऊन लागला आहे. तो १५ दिवसांचा आहे. त्यानंतर आपण जाऊन शूट करणार आहोत. आता कोरोनाच आहे तर काय करणार ना."

"मग सिनेमा पुढेच जात गेला. अखेर तो कधी होणार हेही माहित नाही इथपर्यंत आलं. मग फायनान्सरने माघार घेतली. नवीन फायनान्सर शोधले."

"काही काळाने एक फायनान्सर मिळाले. त्यांना इतर सर्व कास्ट चालणार होती पण त्यांना मुख्य अभिनेत्री मी नको होते. त्यामुळे मला काढून टाकलं."

"मी खूप निराश झाले होते. अक्षरश: कोसळले होते. माझं काही चुकलंय, काम कमी पडलंय यामुळे ही गोष्ट झालेली नाही तर एक तिसरी व्यक्ती येते आणि त्याला मी नको असते म्हणून तो सिनेमा माझ्या हातून जातो."

"तेव्हा माझे १५-२० दिवस खूप वाईट गेले. मला कळलं की या इंडस्ट्रीत असंही होऊ शकतं. आपण कितीही मेहनत केली तरी आपल्या हातात नसतं. पुढेही काही सिनेमांबाबतीत अशाच काही अडचणी आल्या."