'ही' अभिनेत्री आहे कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी पत्नी, श्रेयस तळपदेबरोबर केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 03:13 PM2024-02-20T15:13:22+5:302024-02-20T15:39:53+5:30

२० वर्ष मोठ्या मुख्यमंत्र्यांशीच गुपचूप बांधली लग्नगाठ, एका मुलीलाही दिला जन्म

मनोरंजनविश्वात अफेअर्स, रिलेशनशिप, लग्न, घटस्फोट या काही नवीन गोष्टी नाहीत. त्यातही सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचं राजकीय नेत्यांशी किंवा खेळाडूंशी अफेअर असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलीच आहेत. मात्र कन्नडची अशी अभिनेत्री आहे जिने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्याशीच गुपचूप लग्न केलं.

ही गोष्ट आहे कन्नड अभिनेत्री राधिका शेट्टीची. 2002 साली राधिकाने निनागागी या कन्नड सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर ती अनेक सिनेमांमध्ये झळकली. मात्र काही सिनेमात काम केल्यानंतर ती वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. तिच्या एका निर्णयाने तिचं फिल्मी करिअरच उद्ध्वस्त झालं.

राधिकाचं २००० साली वयाच्या केवळ 13 व्या वर्षी रतन कुमार या व्यक्तीशी लग्न झालं होतं.रतन कुमारच्या आईनेच राधिकाला सिनेसृष्टीत आणलं. मात्र तिचं हे लग्न राधिकाच्या आईलाच पसंत नव्हतं. त्यांनी रतन कुमारवर मुलीशी जबरदस्ती लग्न केल्याचा आरोप लावला होता. लग्नानंतर २००२ साली रतन कुमारचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

मृत्यूआधी रतन कुमारने राधिकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती ज्यामुळे तिच्याविरोधात सर्च वॉरंटही निघालं होतं. रतनने तक्रारीत म्हटलं की, मुलीचं फिल्मी करिअर लग्नाच्या बातमीमुळे धोक्यात येऊ नये म्हणून राधिकाचे वडील २००२ मध्ये तिला स्वत:सोबत घेऊन गेले.

यानंतर राधिका थेट २००५ साली कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री JDS नेते एच डी कुमारस्वामी यांच्यासोबतच्या संबंधांमुळे चर्चेत आली. तर २०१० मध्ये तिने स्वत: एका मुलाखतीत कुमारस्वामी यांच्याशी २००६ सालीच लग्न केलं असल्याचा खुलासा केला. तसेच त्यांना शमिका ही एक मुलगी असल्याचंही सांगितलं. यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. कारण कुमारस्वामी हे विवाहित होते.

कुमारस्वामी यांच्या पहिल्या पत्नीचं नाव अनिता आहे. त्यांचं १९८६ सालीच लग्न झालं होतं. तर २००६ साली राधिकाशी लग्न करताना कुमारस्वामी यांचं वय ४७ वर्ष होतं आणि राधिका तेव्हा २७ वर्षांची होती. त्यांना कुमारस्वामींच्या पहिल्या कुटुंबाने कधीच त्यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करणं गुन्हा आहे. परंतु, कुमारस्वामी-राधिकाच्या लग्नाचा कुठलाही अधिकृत पुरावा नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावली होती.

राधिकाच्या वडिलांचा या लग्नाला कायम विरोध राहिला आहे. मात्र तिने वडिलांच्या विरोधात जाऊन कुमारस्वामींशी लग्नगाठ बांधली. तसंच हे लग्न बराच काळ गुलदस्त्यात ठेवलं. मात्र नंतर कुमारस्वामी यांचे राधिका आणि लेकीबरोबरचे फोटो व्हायरल झाले. शिवाय ते तिच्यासोबत परदेशातही फिरायला जायचे.

कुमारस्वामी यांच्याशी लग्न केल्यानंतर राधिकाचं फिल्मी करिअर मात्र बुडालं. २०१२ साली तिने यशिका एंटरप्रायझेस नावाने प्रोडक्शन कंपनी सुरु केली. या अंतर्गत तिने लकी हा सिनेमा बनवला ज्यामध्ये अभिनेता यश मुख्य भूमिकेत होता.

राधिकाने मराठी अभिनेता श्रेयस तळपदेबरोबरही काम केलं आहे. गेल्या वर्षीच आलेल्या 'अजग्रथा'या कन्नड सिनेमात त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.