प्रेमविवाहानंतर लगेच 'या' कारणामुळे घेतला वेगळंं राहण्याचा निर्णय, अल्का याग्निक यांची अनोखी प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:12 AM2023-03-20T09:12:38+5:302023-03-20T14:27:15+5:30

अल्का याज्ञिक यांचा आज ५७ वा वाढदिवस. गेल्या २७ वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. काय आहे नेमकं कारण?

आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अल्का याज्ञिक (Alka Yagnik) आज ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ९० च्या दशकात प्रत्येक चित्रपटात अल्का यांचं गाणं असणारच हे जवळपास निश्चितच असायचं. अल्का यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट गाणी गायली.

'पायल की झंकार' सिनेमातील 'थिरकता अंग लचक झुकी' या गाण्यापासून त्यांनी करिअरला सुरुवात केली. परदेसी परदेसी, ताल से ताल मिला, सुरज हुआ मधम, चुरा के दिल मेरा या गाण्यांपासून ते आताच्या अगर तुम साथ हो या गाण्यांपर्यंत अल्का यांनी रसिकांना गाण्यांची मेजवानीच दिली. कुमार सानू, उदित नारायण या ९० च्या दशकातील गायकांसोबत त्यांचे ड्युएट सॉंग्स चांगलेच गाजले.

हे झालं त्यांचं प्रोफेशनल आयुष्य. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अशआ काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी ऐकल्या नसतील. प्रेमविवाह करुनही त्या तब्बल २७ वर्षांपासून पतीपासून वेगळ्या राहत आहेत. काय आहे नेमकी त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.

अल्का यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा खास आहे. त्या नीरज कपूरला चक्क रेल्वे स्टेशनवर भेटल्या होत्या. त्या त्यांच्या आईसोबत काही कामानिमित्त दिल्लीत गेल्या होत्या.नीरज कपूर हे त्यांच्या आईच्या मैत्रिणीचे भाच्चे आहेत. ते दोघांनी रेल्वे स्टेशनवर घ्यायला आले होते.

यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. १९८९ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र दोघांचं करिअर हे वेगवेगळ्या शहरात होतं जे त्यांच्या नात्यात आड येत होतं.

मात्र दोघांनी करिअरला महत्व दिलं आणि लग्नानंतरही ते वेगळेच राहिले. नीरज कपूर हे शिलॉंगमध्ये वास्तव्यास असतात तर अल्का करिअरसाठी मुंबईतच राहिल्या. दोघंही थोड्या थोड्या कालावधीनंतर एकमेकांना भेटत राहिले. लग्नानंतर पहिल्याच वर्षी अल्का यांनी मुलीला जन्म दिला.

नीरज कपूर यांनी मुंबईत बिझनेस करायचा बराच प्रयत्न केला. मात्र त्यांची एकदा फसवणूक झाल्याने अल्का यांनी त्यांना शिलॉंगमध्येच परत जाण्यास सांगितले. म्हणून आजतागायत दोघंही वेगवेगळे राहत आहेत. तरी त्यांचं पती पत्नीचं नातं टिकून आहे.

अल्का यांना आतापर्यंत एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तर दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. माधुरी दीक्षितच्या 'एक दो तीन' गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

त्यांनी हिंदी, गुजराती, ओडिया, पंजाबी, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी २ हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. सर्वाधिक गाणी म्हणणाऱ्या गायकांमध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, महम्मद रफी, किशोर कुमार नंतर अल्का यांचा पाचवा क्रमांक येतो.