सचिन खेडेकर यांच्यामुळे सुरु झाली रेणुका शहाणेंची लव्हस्टोरी, म्हणाल्या, 'राणाजींना मी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 10:23 AM2023-07-10T10:23:08+5:302023-07-10T10:34:58+5:30

आशुतोष राणांना ओळखतच नव्हत्या रेणुका शहाणे...

मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 'हम आपके है कौन' मधील भाभी म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या एका स्माईलवर तर आजही भलेभले फिदा होतात.

रेणुका शहाणे यांच्या याच स्माईलवर आणि अभिनयावर राणाजीही फिदा झाले होते. आशुतोष राणा (Ashutosh Rana) तसे दिसायला कडक शिस्तीचे आणि रेणुका शहाणे इतक्या गोड मग यांचं कसं जुळलं असेल असा प्रश्न पडतो. ही लव्हस्टोरी कशी सुरु झाली याचा खुलासा स्वत: रेणुका शहाणे यांनी केला.

सचिन खेडेकर यांच्या 'कोण होणार करोडपती' शोमध्ये रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली. तेव्हा त्या म्हणाल्या की अप्रत्यक्षपणे सचिन खेडेकर यांच्यामुळेच माझी आणि राणाजींची लव्हस्टोरी सुरु झाली. नेमका काय आहे तो किस्सा वाचा.

रेणुका शहाणे म्हणाल्या,'सचिन आणि किशोर कदमच्या जयते सिनेमाच्या स्क्रीनिंगला मी गेले होते. दोघेही माझे जवळचे मित्र. त्यांनी मला बोलावल्यामुळे मी एकटीच गेले होते. तिथे माझी जीवलग मैत्रिण राजेश्वरी सचदेव आली होती. तर तिच्यासोबत होते आशुतोष राणा.'

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी त्यांना अजिबातच ओळखत नव्हते. कारण मी त्यांचं एकही काम पाहिलं नव्हतं. दुश्मन, स्वाभिमान हे कोणतेच चित्रपट मी पाहिले नव्हते. आणि ते अशा आविर्भावात होते की हिने तर मला ओळखलंच असेल. तसंच त्यांनी माझं काम पाहिलं होतं असं ते म्हणाले.

त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं की अरे हा माणूस तर खूप हुशार दिसतोय. बुद्धिमान आहे. विचारही चांगले आहेत. ते मला पाहिल्यापासूनच माझ्या प्रेमात होते. स्क्रीनिंगनंतर घरी जाताना त्यांनी मला मी सोडू का असं विचारलं. तेव्हा मी म्हटलं नको मी जाईन. नंतर त्यांनी मला टॅक्सीची वाट बघताना पाहिलं. तेव्हा त्यांना वाटलं अरे ही प्रसिद्ध अभिनेत्री असून टॅक्सीने जाते.

तेव्हा मी त्यांना म्हटलं माझ्याकडे गाडी नाही. मी मुंबईकरच आहे मॅनेज करेन. मी त्यांना विचारलं तुम्हाला कुठे जायचंय. तर ते चेंबुर असं म्हणाले. तेव्हा मी म्हटलं असा कोणताच रस्ता नाहीए जो जुहूवरुन शिवाजी पार्कला जाऊन चेंबुरला जात असेल.

नंतर आमच्या गप्पा सुरु झाल्या. आमचा खरा रोमान्स फोनवरच सुरु झाला. ते मला कविता ऐकवायचे. एकदा त्यांनी एक कविता ऐकवली आणि विचारलं याचा अर्थ काय. मी म्हणाले याचा अर्थ प्रेम असा आहे. नंतर आम्ही भेटलो आणि एकमेकांना जीवनसाथी म्हणून पसंत केलं.