Namrata Shirodkar : लग्नानंतर का सोडली अ‍ॅक्टिंग? नम्रता शिरोडकरने 17 वर्षानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 03:11 PM2022-12-19T15:11:51+5:302022-12-19T15:28:32+5:30

Namrata Shirodkar : करिअर पीकवर असताना अचानक नम्रता शिरोडकरने साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केलं आणि बॉलिवूडला रामराम ठोकला. तिच्या या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसल होता...

1993 साली मिस इंडियाचा खिताब जिंकल्यानंतर नम्रता शिरोडकर बॉलिवूडमध्ये आली. सलमानच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या सिनेमात एका छोट्याशा रोलने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात झाली.

यानंतर वास्तव, कच्चे धागे अशा अनेक सिनेमात ती झळकली. या चित्रपटानंतर फार कमी वेळात नम्रता शिरोडकरचं नाव झालं. पण करिअर पीकवर असताना अचानक तिने साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केलं आणि बॉलिवूडला रामराम ठोकला.

तिच्या या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसल होता. करिअर पीकवर असताना नम्रताने अचानक लग्नाचा निर्णय का घेतला आणि पाठोपाठ चित्रपटांत काम करणं का सोडलं? हे कळायला मार्ग नव्हता.

पण आता 17 वर्षानंतर खुद्द नम्रताने याबाबत खुलासा केला आहे. ‘प्रेमा द जर्नलिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली.

चित्रपट सोडून लग्न करण्याचा निर्णय का घेतला? असं विचारलं असता ती म्हणाली, मी खूप आळशी होते. मी काहीही प्लान केलेलं नव्हतं. जे काही घडलं ते सगळं योगायोगाने घडत गेलं.

पुढे ती म्हणाली, मॉडेलिंग करून मी कंटाळले होते. म्हणून मी अ‍ॅक्टिंगमध्ये आले. पण तेव्हा मी प्रचंड आळशी होते. अर्थात पुढे मला अ‍ॅक्टिंग आवडू लागली. मात्र याच काळात माझ्या आयुष्यात महेश आला आणि आम्ही लग्न केलं.

त्यावेळी मी अ‍ॅक्टिंग थोडं सीरिअसली घेतली असती तर कदाचित माझं आयुष्य काही वेगळं असतं. पण हो, महेशसोबत लग्न करण्याचा निर्णय माझ्या आयुष्याचा आनंदाचा क्षण होता, असं ती म्हणाली.

पुढे तिने सांगितलं, ‘लग्नानंतर जगच बदललं. आई बनण्याचा अनुभव वेगळाच होता. कुठल्याही गोष्टीसाठी ही एक गोष्ट मी बदलेल, असं मला वाटत नाही. आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मला कुठल्याही निर्णयाचा पश्चाताप नाही.

वामसी या तेलगू सिनेमात महेशबाबू हा नम्रताचा हिरो होता. त्याआधी महेशबाबूचं नावंही तिने ऐकलं नव्हतं. महेश बाबू व नम्रता ‘वामसी’च्या मुहूतार्ला पहिल्यांदा भेटले आणि या पहिल्याच भेटीत महेशबाबू नम्रतावर लट्टू झाला.

चित्रपटाचं शूटींग सुरू झालं आणि महेशबाबू नम्रताच्या प्रेमात जणू वेडा झाला. चित्रीकरणानंतर बराच वेळ ते दोघं एकत्र घालवू लागले.

अर्थात जगापासून दोघांनीही आपली लव्हस्टोरी लपवून ठेवली. अगदी महेशबाबूने त्याच्या घरच्यांपासूनही प्रेमप्रकरण लपवलं होतं. पाच वर्षे असंच चाललं. पण यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अर्थात लग्नाआधी महेशबाबूची एक अट होती. असं म्हणतात की, लग्नानंतर नम्रताने सिनेमा सोडून घर सांभाळावं, अशी अट त्याने नम्रतापुढे ठेवली. नम्रताने महेशबाबूची ही अट लगेच मान्य केली.